
नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीसाठी बारमेरमधून तिकीट न मिळाल्याने नाराज झालेले भाजपचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंग यांनी अखेर बंडाचा झेंडा उभारला असून सोमवारी ते अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्वत: जसवंत सिंग यांनीच ही घोषणा रविवारी केली.
मात्र अजूनही सिंह यांचं तळ्यात- मळ्यात सुरु आहे. आपण आपल्या सहका-यांशी चर्चा करणार आहोत. त्यानंतर पक्षाने दखल घेतली नाही तर सोमवारी अर्ज भरणार असल्याचे ते म्हणाले.
सध्याच्या भाजप या पक्षात बाहेरून आलेल्या लोकांनी अतिक्रमण केल्याचा आरोप जसवंत सिंग यांनी केला आहे. बारमेरमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचे संकेत देत त्यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे जाहीर केले.बारमेरमधून निवडणूक लढवण्याची आपली इच्छा असताना आपल्याला डावलून काँग्रेसमधून भाजपात आलेल्या कर्नल सोनाराम चौधरींना पक्षाने उमेदवारी दिली. आपल्या बाबतीत पक्षाने दुसर्यांदा असे केले असल्याचे जसवंतसिंग म्हणाले. पक्षाने दोनदा दगाफटका केल्याने आता तडजोडीची कुठलीच शक्यता नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.









