
यवतमाळ, दि.3 : मागेल त्याला हक्काने काम देणा-या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांना केंद्र शासनाच्यावतीने गौरविण्यात आले. नरेगाचा दहावा वर्धापन दिन नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात साजरा करण्यात आला. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना अमरावती येथे केलेल्या कामासाठी त्यांच्या सहकाराऱ्यांसह पुरस्कार देऊन सन्मानित केल्या गेले.
केंद्रीय ग्रामविकास मंत्री बिरेंद्र सिंग, राज्यमंत्री सुदर्शन भगत, पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री रामकृपाल यादव, पंचायतराज राज्यमंत्री निहालचंद या केंद्रीय मंत्र्यांसह देशातील विविध राज्यातील व केंद्रशासित प्रदेशातील ग्रामविकास मंत्री, वरिष्ठ अधिकारी, सभापती, सरपंच, मनरेगामध्ये काम करणारे मजूर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी राज्यातून 80 प्रतिनिधी सहभागी झाले होते. अमरावती जिल्ह्यातील आदिवासीबहूल चिखलदरा तालुक्यात जिल्हाधिकारी राहूल रंजन महिवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांनी उत्तमप्रकारे मनरेगा योजना राबविली होती. त्यांच्या कल्पतेनेच हजारे आदिवासी बांधवांपर्यत योजना पोहोचविण्यासोबतच त्यांना योजनेचा लाभ घेता आला. अमरावती जिल्ह्यात सिचंन क्षेत्र कमी आहे. उदरनिर्वाह करण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असते. हे थांबविण्याकरिता श्री.महिवाल यांनी अमरावती जिल्ह्यात त्रिस्तरीय योजना राबविली होती. गावांमध्ये जाऊन प्रत्यक्ष लोकांशी संवाद साधला. यामुळे मनरेगाच्या कामांना गती मिळाली. फलोत्पादन, जलसंधारण, वृक्षारोपण या माध्यमातून पाणी टंचाईवर मात करण्यात प्रयत्न केले. त्याचा परिणाम म्हणून अमरावती जिल्ह्याच्या गेल्या दोन वर्षात मानव विकास निर्देशांकही वाढला आहे. तसेच स्थलांतर मोठया प्रमाणात कमी झाले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांच्यासह योजनेच्या लाभाची रक्कम पारदर्शीपणे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणारे शाखा पोस्ट मास्टर गोकुल शंकर अलोकार यांनाही केंद्रीय सन्मानित करण्यात आले. जिल्हाधिकारी महिवाल यांच्या कौतूक होत आहे.









