जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे वाढते मधुमेहाची शक्यता

अलिकडेच करण्यात आलेल्या अभ्यासानुसार ज्या स्थूल व्यक्तींमध्ये जीवनसत्वाचे प्रमाण कमी असते त्यांना मधुमेह होण्याचा धोका अधिक प्रमाणात संभवतो. स्थूलपणामुळे मधुमेहाची शक्यता वाढते ही बाब तर सर्वज्ञातच आहे. त्याचबरोबर जीवनसत्वाचे अपुरे प्रमाण हे देखील मधुमेह होण्यास कारणीभूत ठरू शकते. मात्र या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यास इंशुलिनचे प्रमाण असंतुलित करणाऱ्या या आजाराची शक्यता अधिक बळावते असे या नवीन अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.  डायबेटिस केअर या नियतकालिकामध्ये या अभ्यासातून प्राप्त झालेले निष्कर्ष प्रसिद्ध करण्यात आले आहे.  इंशुलिनचे असंतुलन हे मधुमेहाची पूर्वसूचना देणारे महत्वाचे लक्षण आहे.
उपरोल्लेखित अभ्यासाकरिता वैज्ञानिकांनी जवळपास ६००० व्यक्तींच्या प्रकृतीविषयक माहितीचा अभ्यास केला. त्यामध्ये असे आढळले की ज्या व्यक्ती स्थूल आहेत मात्र त्यांच्या शरीरामध्ये जीवनसत्वाचे प्रमाण उत्तम आहे त्यांच्यात सर्वसाधारण प्रकृतीच्या व्यक्तींच्या तुलनेत इंशुलिन असंतुलनाची शक्यता वीसपटीने अधिक होती. मात्र स्थूलपणा आणि जीवनसत्वाचे अपुरे प्रमाण ही दोन्ही लक्षणे असलेल्या व्यक्तींमध्ये हीच शक्यता ३२ पटींनी अधिक असल्याचे दिसून आले.
पेनिसिल्व्हानिया येथील ड्रेक्सेल विद्यापीठातील वैज्ञानिकांनी याबाबत माहिती देताना सांगितले की जीवनसत्वाचे अपुरे प्रमाण आणि स्थूलपणा ही इंशुलिनचे असंतुलन आणि मधुमेह या दोन्ही समस्यांची स्वतंत्र कारणे आहेत. मात्र आम्ही केलेल्या अभ्यासातून प्राप्त झालेल्या निष्कर्षांनुसार हे दोन घटक स्वतंत्रपणे इंशुलिनच्या असमतोलास ज्या प्रमाणात कारणीभूत ठरू शकतात त्यापेक्षा या दोन घटकांच्या एकत्र येण्याने ही शक्यता कितीतरी अधिक प्रमाणात वाढु शकते.
या क्षेत्रातील तज्ञांच्या मते जर या अभ्यासाचे निष्कर्ष स्वीकारण्यायोग्य असतील तर मधुमेहाचे बहुतांश रूग्ण हे  औषधांबरोबर किंवा औषधांशिवाय केवळ जीवनसत्वाचे वार्षिक इंजेक्शन घेऊन रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवू शकतील.
नोव्हा स्पेशालिटी सर्जरीचे वरिष्ठ बॅरिऐट्रिक सर्जन डॉ.रमन गोएल यांनी याविषयी बोलताना म्हंटले, आपल्याकडे भरपूर सूर्यप्रकाश आणि दूधदेखील मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र तरीही आपल्या देशातील ६० ते ७० टक्के नागरिकांमध्ये जीवनसत्वाची कमतरता असल्याचे आढळते ही बाब देखील सर्वज्ञात आहे. मला असे वाटते की जीवनसत्वाची कमतरता हे मधुमेह होण्याचे कारण ठरण्यापेक्षा मधुमेहाचे प्रमाण वाढविणारा एक घटक ठरेल.  मधुमेहाच्या सुरूवातीच्या टप्प्यामध्ये किंवा ज्यांच्याकडे कुटुंबातील अन्य व्यक्तींना मधुमेह असेल अशा व्यक्तींसाठी जीवनसत्वाचे प्रमाण योग्य आहे याकडे लक्ष देणे आणि त्या अनुषंगाने उपाय करणे यासारख्या गोष्टींमुळे मधुमेहाचा आजार लांब ठेवता येईल किंवा हा आजार टाळता येऊ शकेल.
डॉ.गोएल यांनी पुढे सांगितले, आमच्याकडे बॅरिऐट्रिक सर्जरी करण्यासाठी आलेल्या रूग्णांपैकी ३५ टक्क्यांपेक्षा अधिक रूग्णांमध्ये टाईप २ या प्रकारचा मधुमेह आढळतो. जवळजवळ त्या सर्वांमध्येच जीवनसत्वाची कमतरता असल्याचेही दिसून येते. शस्त्रक्रिया केल्यानंतर आणि जीवनसत्वाची पूरक जोड दिल्यानंतर या शस्त्रक्रियेच्या पश्चात मधुमेहाचे प्रमाण कमी होण्यासाठी शस्त्रक्रिया आणि जीवनसत्वाच्या प्रमाणात झालेली सुधारणा यांचे परस्पर योगदान किती असेल हे पडताळून पाहणे ही निश्चितच एक कुतुहलाची बाब ठरेल.स्थूल व्यक्तींमध्ये इंशुलिनचे असंतुलन आणि मधुमेहाची शक्यता कमी होण्यासाठी पूरक औषधे उपयोगी ठरतील की नाही हे निश्चित करण्याकरिता याविषयी अजून संशोधन करण्याची गरज आहे असेही वैज्ञानिकांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


6 − six =