मुंबई – राज्यातील शिक्षणाची गुणवत्ता आणि दर्जा वाढविण्यासाठी पहिल्यांदाच १५ डिसेंबर २०१३ रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) निकाल शुक्रवारी, सात मार्च रोजी जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या http://mahatet.in या संकेतस्थळावर दुपारी तीन वाजता ऑनलाइन जाहीर होईल अशी माहिती परीक्षा परिषदेचे आयुक्त व्ही.बी. पायमल यांनी ‘प्रहार’शी बोलताना दिली.
टीईटी परीक्षेचा निकाल १५ फेब्रुवारीपर्यंत लागणे अपेक्षित होते, परंतु परीक्षा परिषदेकडून गेल्या काही दिवसांमध्ये तारीख पे तारीख करण्यात आली. यामुळे या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांमध्ये निकाल कधी लागेल यासाठीची उत्सुकता निर्माण झाली होती. राज्यात घेण्यात आलेल्या टीईटीची पहिलीच परीक्षा सहा लाख २१ हजार ११५ शिक्षक उमेदवारांनी दिली आहे. राज्यातील शाळांमध्ये नव्याने नियुक्त होणा-या या शिक्षकांच्या गुणवत्तेची कसोटी म्हणून टीईटीची ही घेण्यात आलेली पहिलीच परीक्षा आहे. यामुळे या परीक्षेत किती शिक्षक यशस्वी होतील याबाबतची उत्सुकता या शिक्षकांसोबतच सर्व शिक्षणक्षेत्रात निर्माण झाली आहे.
टीईटीच्या निकालासाठी थोडा उशिरा झाला असला तरी त्यासाठीची पूर्ण तयारी करण्यात काही अडचणी होत्या. टीईटीचा निकाल परिषदेच्या या संकेतस्थळावर उपलब्ध होणार असल्याने त्याचे वेळी गुणपत्रिकेसंदर्भातील माहितीही उमेदवारांना उपलब्ध असेल. गुणपडताळणी अथवा काही शंका असल्यास त्यासाठीचीही सर्व माहिती टीईटीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येणार आहे.









