
मेलबर्न – भारतीय क्रिकेट संघाला पोषाख पुरस्कृत करणा-या नाईकेने गुरुवारी टीम इंडियाच्या एकदिवसीय सामन्यांच्या नव्या गणवेशाचे अनावरण केले.
नाईकेने खास पूर्नप्रक्रिया केलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांपासून टी-शर्ट आणि पायजम्याचा प्रत्येक संच बनवला आहे. प्रत्येक संच बनवण्यासाठी सरासरी ३३ प्लास्टिक बाटल्यांचा वापर करण्यात आला आहे.
खेळाडूंना मैदानावर जास्तीत जास्त मदत होईल अशा पध्दतीने टीम इंडियाचा नवा पोषाख तयार करण्यात आला आहे. टीम इंडियाचा नवा गणवेश वजनाने हलका, आरामदायक आणि मैदानावर खेळाडूंचे कमीत कमी लक्ष विचलित होईल अशा पध्दतीने बनवण्यात आला आहे असे भारताच्या एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने सांगितले.
२०१५ हे टीम इंडियासाठी महत्वाचे वर्ष आहे. क्रिकेटमधील सर्वोच्च शिखर समजल्या जाणा-या विश्वचषकाचे जेतेपद मिळवण्यासाठी जगातले सर्वोत्तम संघ परस्परा विरुध्द मैदानात उभे ठाकणार आहेत. टीम इंडियाचा गणवेश हा नुसता पोषाख नाही त्यापेक्षा भरपूर काही आहे.
या पोषाखामध्ये कोटयावधी लोकांच्या इच्छा, अपेक्षा सामावल्या आहेत. हा रंग संपूर्ण देशाला एकासूत्रात बांधतो असे बीसीसीआयचे सचिव संजय़ पटेल म्हणाले. टीम इंडियाची गरज लक्षात घेऊन नाईकेने हा पोषाख बनवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा जो वापर केला त्याने आम्ही समाधानी आहोत असे पटेल म्हणाले.









