
यवतमाळ, दि. ९ – नेर तालुक्यातील लोहतवाडी (रत्नापूर) येथील आठ युवक होळी सण साजरा करून औरंगाबाद येथे जात असताना पुणे औरंगाबाद दरम्यान ट्रव्हल्स व कंटेनरचा अपघात झाला. यामध्ये एक युवक जागीच ठार तर ७ जण जखमी झाल्याची घटना आज सोमवारी सकाळी ७ वाजता घडली.
लोहतवाडी येथील विलास किसन राठोड (२२), कैलास किसन राठोड (२५), निवृत्ती विठ्ठल राठोड (२३), मुन्ना विठ्ठल राठोड, राहुल काळे, रामेश्वर चव्हाण, विजय जाधव, देवानंद जाधव आदी मित्र औरंगाबाद येथे मोलमजुरीचे काम करतात. दरम्यान होळी हा उत्सव साजरा करण्यासाठी ते आपल्यागावी लोहतवाडी येथे आले होते. दरम्यान परिवाराची भेट घेऊन ते काल रात्री ट्रव्हल्सने जात असताना या ट्रव्हल्सला कंटेनरने धडक दिली. झालेल्या या भिषण अपघातात विलास किसन राठोड (२२) हा जागीच ठार झाला. तर त्याचा भाऊ कैलास राठोड, निवृत्ती राठोड, मुन्ना राठोड हे या अपघातात गंभीर जखमी झाले असून राहुल काळे, रामेश्वर चव्हाण, विजय जाधव, देवानंद जाधव हे चार किरकोळ जखमी आहे. त्यांच्यावर औरंगाबाद शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती लोहतवाडीचे उपसरपंच बाबाराव राठोड यांनी दिली.









