
पांढरकवडा – उच्च-नीचतेला व असमानतेला धर्माची साथ अथवा मान्यता मिळाल की, शोषक व्यवस्था निर्माण होत असते. आज दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, स्त्रीया आणि कामगार अशाच व्यवस्थेच्या मोठ्या प्रमाणात बळी होत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ‘जाती निर्मूलन’ हा ग्रंथ आणि त्याला महात्मा गांधी यांनी दिलेले प्रत्यूत्तर वाचल्यानंतर खोलात जावून संशोधन केले. आणि माझ्या हातून ‘डॉक्टर आणि संत’ हे प्रस्तावना पुस्तक लिहील्या गेले. जाती अस्तित्वाचे महात्मा गांधी यांनी समर्थन केले. उलट डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जाती निर्मूलनाच्या लढ्याला उच्च मानवी मुल्यांचे अधिष्ठान दिले, असे विचार आंतरराष्टÑीय ख्यातीच्या व बुकर आणि मॅगसेसेन पुरस्कार प्राप्त लेखिका अरुंधती रॉय यांनी व्यक्त केले.
येथील सामाजिक कार्यकर्ते प्रा. हरिश्चंद्र भेले, डॉ. लिला भेले यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. आधुनिक झगमगाटाच्या वातावरणातही लेखकांना लोकांच्या मनात जागा असल्याबद्दल समाधान व्यक्त करुन अरुंधती रॉय म्हणाल्या की, द. आॅफ्रिकेतील महात्मा गांधीच्या आंदोलना संदर्भात इतिहास लेखनातून आणि पाठ्यपुस्तकातून चुकीचे सांगितल्या जात आहे. परिणामी अनेक आंदोलना बाबत गांधी-आंबेडकर यांच्यातील खरा वैचारिक संघर्ष पुढे आला नाही. सुरुवातीला प्रा. हरिश्चंद्र भेले यांनी प्रास्ताविक केले. डॉ. लिला भेले, डॉ. अजित चाहल, प्राचार्य डॉ. रमजान विराणी, अॅड. पंकज शेटे, अॅड. माणिक चौधरी, प्रा. झिलपिलवार, प्रा. राहुल दखणे, प्रभुतींनी अरुंधती रॉय यांचे स्वागत केले. पांढरकवडा या आदिवासी बहुल परिसरासाठी हा एैतिहासीक क्षण असल्याचे उपस्थित मान्यवरांनी उद्गार काढले. यावेळी सुनिल सरदार, डॉ. ग्रँड उपस्थित होते.









