
नागपूर – देशात वाघांच्या संख्येत ५२० ने वाढ झाली असली तरी वाघांची कथित राजधानी म्हणून ओळखल्या जाणा-या विदर्भात वाघ विशेष वाढलेले नाहीत.
महाराष्ट्रात फक्त २१ वाघ वाढले आहेत. वन खात्याने व्याघ्र गणनेच्या जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात १९० वाघ आहेत. त्यातील १७० ते १७५ वाघ विदर्भात असतील. ताडोबा, पेंच आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पांमध्ये हे वाघ आहेत.
यातील सर्वाधिक १०५ वाघ ताडोबाच्या जंगलात आहेत. महाराष्ट्रातील वाघांच्या संख्येत इतर राज्यांच्या संख्येत फार कमी वाढ आणि टक्केवारीत सांगायचे तर फक्त १२ टक्के वाढ आहे. विदर्भातील वन्यप्रेमींनी चिंता करावी, अशी परिस्थिती विदर्भात आहे.
जंगल आणि वाघांच्या रक्षणावर कोटय़वधी रुपये खर्च झाले असताना ही कामगिरी निराशाजनक आहे, असे वन्यप्रेमींचे मत पडले. विदर्भात वाघांच्या शिकारीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या चार वर्षात २२ वाघांची शिकार झाली.
कर्नाटकात वाघ वाढले. विदर्भात वाढू शकले नाहीत याला हे बेकायदा शिकारी कारण असल्याचे सांगितले जाते. कर्नाटकात ४०८ वाघ आहेत. आठ वर्षापूर्वी तिथे २९० वाघ होते. मध्य प्रदेशात ३०८ वाघ झाले आहेत. चार वर्षापूर्वी २५७ वाघ होते.









