
चेन्नई – तामिळनाडूमधील तिरुवेल्लर जिल्ह्यात भिंत कोसळून झालेल्या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये चार महिला आणि मुलांचा समावेश आहे.
‘शनिवारी झालेल्या मोठ्या पावसामुळे ही वीस फूट उंच भिंत कोसळली. यामध्ये ११ जण ठार झाले. ठार झालेल्यांमध्ये नऊ आंध्र प्रदेशमधील तर इतर तामिळनाडू येथील रहिवासी आहेत’,अशी माहिती तिरुवेल्लर जिल्हाधिकारी के. वीरा. राघव यांनी दिली. या प्रकरणी ज्या कंपनीसाठी ही भिंत उभारण्यात येत होती त्या कंपनीच्या मालकांना अटक करण्यात आली आहे. रामनाथन आणि बाळू अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
दरम्यान, तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी मृत व्यक्तींना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच या प्रकरणी दोषी असलेल्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी पोलिसांना दिले.आठवड्याभरापूर्वीच चेन्नईमधील ११ मजली इमारत कोसळून झालेल्या अपघातात ६१ जणांना आपला जीव गमवावा लागला होता.









