
नवी दिल्ली -तिहार तुरुंगातील दहशतवाद्यांची सुटका करण्यासाठी लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी तुरुंगावर हल्ला करण्याची शक्यता आहे असा इशारा गुप्तचर यंत्रणेकडून मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर तिहार तुरुंगातील सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे.
पेशावरमध्ये झालेला दहशतवादी हल्ला आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौ-याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत यापूर्वीच हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तुरुंगातील सुरक्षाव्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे. तुरुंगाातील कैद्यांची सुरक्षा ही आमची पहिली जबाबादारी आहे. याबाबत आम्ही कोणताही धोका पत्करु शकत नाही, असे कारागृह उप महानिरीक्षक मुकेश प्रसाद यांनी सांगितले.
तिहारमधय्ये अनेक मोठमोठे दहशतवादी तसेच कैदी आहेत. हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला आणि सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉयही तिहार तुरुंगात आहेत. तुरुंगातील सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली असून तुरुंगातील आणि तुरुंगाच्या बाहेरील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांची तुरुंगातून सुटका कऱण्यासाठी हा हल्ला केला जाणार असल्याची माहिती आहे.









