
नवी दिल्ली- राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आंध्रप्रदेश पूर्नरचना विधेयक२०१४ विधेयकावर स्वाक्षरी केली. यामुळे तेलंगण राज्य निर्मितीची औपचारीकता पूर्ण झाली आहे. या विधेयकाला संसदेच्या दोन्ही सभागृहाने मंजूर दिली होती. याच बरोबर राष्ट्रपतींनी आंध्र प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे.
संसदेने मंजूर केलेल्या विधयेकावर स्वाक्षरी केल्यानंतर देशातील २९वे राज्य म्हणून तेलंगण राज्य निर्मितीची प्रक्रिया पूर्ण सुरु होईल. नव्या राज्यामुळे आंध्र प्रदेशमध्ये १३ जिल्हे राहतील तर तेलंगण राज्यात दहा जिल्हे असतील. तेलंगण राज्य निर्मितीवेळी केंद्र सरकारने सिमांध्रला विशेष पाच वर्ष विशेष राज्याचा दर्जा देण्याची घोषणा केली होती.
दरम्यान, तेलंगण राज्य निर्मितीला संसदेने मंजुरी दिल्यानंतर काँग्रेसचे मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांनी १९ फेब्रुवारी रोजी राजीनामा दिला होता. यासंदर्भात केंद्र सरकारने शुक्रवारी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली होती. त्याला राष्ट्रपतींनी मंजूरी दिली.









