तेलंगण विधेयक राज्यसभेत मंजूर

नवी दिल्ली – प्रचंड गदारोळ आणि आरडाओरड सुरु असताना स्वतंत्र तेलंगण राज्याचे विधेयक आज, गुरुवारी राज्यसभेत मंजूर करण्यात आले. यासोबत तेलंगण हे देशातले २९ वे नवे राज्य अस्तित्वात आले असून महाराष्ट्राला एक नवा शेजारी मिळाला आहे.
तेलंगण राज्याच्या निर्मितीचे विधेयक राज्यसभेत मंजूर होताच दिल्लीत आंध्रभवनसमोर जल्लोष व्यक्त करण्यात आला. तर आंध्रप्रदेशातील विरोधी पक्षांच्या खासदारांनी सरकारच्या या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. आज, गुरुवारी राज्यसभेत हे विधेयक मांडले गेल्यानंतर याविषयावर अनेक पक्षाच्या नेत्यांनी आपापली मते मांडली. कॉंग्रेसचे आंध्र प्रदेशातील खासदार, पर्यटन मंत्री चिरंजीवी यांनी पक्षाच्या भूमिकेच्या विरुद्ध जाऊन या विधेयकाला विरोध दर्शवला. पक्षाच्या अधिकृत भूमिकेच्या विरोधात बोलताना दुःख होत असल्याचे ते आपल्या भाषणात म्हणाले. भाजपने या विधेयकाला पाठिंबा जाहीर केला. स्वतंत्र तेलंगण राज्य निर्मितीली भाजपचा नेहमी पाठिंबा होता, असं राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी सांगितले. केंद्रातील यूपीए सरकारने अत्यंत घिसाडघाईने ही प्रक्रिया केली असल्याचा आरोप जेटली यांनी केला. बसप नेत्या मायावती यांनी यावेळी उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राची विभागणी करावी अशी मागणी केली. लोकजनशक्ती पार्टीचे खासदार रामविलास पासवान यांनी महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा वेगळा करण्याची मागणी केली. तृणमूल कॉंग्रेसच्या खासदारांनी पंतप्रधानांसमोर जाऊन पेपर फाडून निषेध व्यक्त केला. सीमांध्रचे खासदार पंतप्रधानांच्या भाषणात व्यत्यय आणताना दिसत होते. स्वतंत्र तेलंगणच्या विधेयकावर मतदान सुरु होताच डावे पक्ष आणि एआयएडीएमचेच्या खासदारांनी मात्र सभात्याग केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


7 − five =