
हैदराबाद- आंध्रप्रदेश व तेलंगणमधील आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तेलगू देसम पक्षाने (टीडीपी) भारतीय जनता पक्षाबरोबर (भाजप) युती करण्याचा निर्णय घेतला आहे. टीडीपीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू आणि भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी रविवारी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आपला निर्णय जाहिर केला. टीडीपीच्या या निर्णयामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) आणखी एक घटक पक्ष सहभागी झाला आहे. अकाली दलाचे खासदार नरेश गुजराल यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली.
या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन लोकसभा व विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अद्याप जागावाटपाबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. भाजप आंध्रप्रदेशमध्ये ५ तर तेलंगणमध्ये ८ जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे समजते. या युतीमुळे दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये मात्र नाराजीचे वातावरण पसरले आहे. १९९९ ते २००५ पर्यंत चंद्राबाबू नायडू एनडीएत होते. मात्र २००५ मध्ये विधानसभा निवडणुकीतील पराभवासाठी भाजपला जबाबदार ठरवत त्यांनी एनडीएला सोडचिठ्ठी दिली होती. तेलंगणमध्ये ३० एप्रिल तर सीमांध्रमध्ये ७ मे रोजी विधानसभा निवडणूक होणार आहे.









