
यवतमाळ – दोन दिवसापूर्वी अचानक बेपत्ता झालेल्या दोन युवकांचे मृतदेह शनिवारी सायंकाळी निळोणा धरणात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दोनही युवकांना पोहता येत नसल्याने त्यांच्या मृत्यूचे गुढ कायम असून घातपात झाल्याचा संशय मृतांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला. आज रविवारी दुपारी इन कॅमेरा दोन्ही युवकाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या स्वाधीन केले आहे.
अश्वजीत हर्षवर्धन ठमके (२१), पंकज भीमराव राजगडकर (१८) रा. बांगरनगर अशी मृतांची नावे असून अश्वजीत हा वादाफळे महाविद्यालयात बीएसएसी (कृषी) भाग दोन तर पंकज हा जगदंबा विज्ञान महाविद्यालय इयत्ता बारावीचा विद्यार्थी होता. ११ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता अश्वजीत हा बँकेत पैसे जमा करण्यासाठी तर पंकज हा चप्पल घेण्यासाठी जात असून अर्ध्या तासात परत येतो असे सांगून घरून निघाले होते. दुपार होऊनही घरी न परतल्याने कुटुंबियांनी दोघांच्याही मोबाईलवर संपर्क साधला. मात्र त्याच्यासोबत संपर्क झाला नाही. त्यानंतर मित्र मंडळीकडे चौकशी केली. मात्र त्यांचा थांगपत्ता लागत नसल्याने शहर पोलिस ठाणे गाठून बेपत्ता असल्याची रितसर तक्रार नोंदविली होती. अशातच काल शनिवारी सायंकाळी निळोणा धरणात दोन युवकांचे मृतदेह तरंगतांना आढळले़ या बाबतची माहिती मिळताच शहर, वडगाव रोड व ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह पाण्याबाहेर काढले. शहर पोलिसात दोन युवक बेपत्ता असल्याची नोंद असल्याने त्यांनी ठमके व राजगडकर कुटुंबियांना ओळख पटविण्यासाठी म्हणून घटनास्थळी बोलावून घेतले. दोन्ही मृतदेह अश्वजीत व पंकजचे असल्याची खात्री पटताच वडीलांनी टाहो फोडला. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रात्रीच कै.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले. आज दुपारी शवविच्छेदन इन कॅमेरा करावे अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने पोलिसांची तारांबळ उडाली होती. शवविच्छेदन गृहासमोर नातेवाईकांची झालेली गर्दी व घटनेचे गांभीर्य ओळखून इन कॅमेरा शवविच्छेदन केले. आज दुसºया दिवशीही या घटनेचे गुढ कायम असून प्रेमप्रकरणातून दोन्ही युवकाचा खून झाल्याची चर्चा सुरू बांगरनगर परिसरात सुरू होती. या प्रकरणी वडगाव रोड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.
पोलिसांनी परिसर काढला पिंजून
यवतमाळ ग्रामीण, शहर व वडगाव रोड या तीन्ही ठाण्याचे पोलीस अधिकारी व ३० पोलिस कर्मचाºयांच्या पथकाने सकाळी निळोणा धरण गाठले. युवकांचे कपडे व साहित्य शोधण्यासाठी पथकाने तब्बल तीन तास परिसर पिंजून काढला. मात्र या ठिकाणी त्यांच्या हाती काहीही लागले नाही. त्यामुळे त्यांना रिकाम्या हाताने परत यावे लागले.
अश्वजीतला पोहता येत नव्हते: हर्षवर्धन ठमके
अश्वजीत व पंकज या दोघांना पोहता येत नव्हते. त्यामुळे दोघेही पोहण्यासाठी धरणावर जाणे शक्य नाही. त्यांचा मृत्यू पोहताना झाला नसून घातपात झाल्याचा संशय अश्वजीतचे वडील हर्षवर्धन ठमके यांनी दै.‘पुण्यनगरी’शी बोलताना व्यक्त केला. दोघांच्याही मृतदेहावर जखमा दिसून आल्या. बेपत्ता असल्यापासून अश्वजीतचा मोबाईल बंद आहे. मात्र काल सकाळी ११ वाजता दरम्यान नातेवाईकाने मोबाईलवर संपर्क केला असता ३० सेकंद बेल वाजली. त्यानंतर मोबाईल पुन्हा बंद करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांची भेट घेणार असल्याचे ठमके यांनी सांगितले.









