
नवी दिल्ली/श्रीनगर- कडाक्याच्या थंडीमुळे नवी दिल्लीत सर्वत्र दाट धुके पसरले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून येथील जनजीवन विस्कळित झाले आहे. शनिवारी नवी दिल्लीतील तापमान ८.४ अंश नोदवले गेले. कारगिलमध्ये तर अक्षरश: हुडहुडी असून, तेथील तापमान उणे १५.८ नोंदवले गेले आहे.
खराब हवामानामुळे नवी दिल्लीतील विमाने आणि रेल्वे सेवेचे वेळापत्रक कोलमडले असून, ३० विमाने व ५५ रेल्वे गाडय़ा नियोजित वेळेपेक्षा काही तास उशिराने धावत आहेत.
जनशताब्दी एक्स्प्रेस, दुरोंतो एक्स्प्रेस, पंजाब मेल, ब्रह्मपुत्र मेल, ओदिशा संपर्क क्रांति एक्स्प्रेस या गाडयांना याचा फटका बसला आहे.
दरम्यान, काश्मीर खो-यात लडाख भागातही कडाक्याच्या थंडीची लाट आहे. २० जानेवारीपर्यंत वेस्टर्न डिस्टर्बन्सचा फटका जम्मू आणि काश्मीरला बसण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान खात्याच्या प्रवक्त्याने दिली. शनिवारी श्रीनगरमध्ये उणे ३.३ अंश, काश्मीर खो-यातील काझिगुंड येथे उणे ४.४, तर अंबरनाथ यात्रेसाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाव येथे उणे ६.२ तापमान नोंदवले गेले आहे.









