
बीड – देशातील दलित चळवळीचे ज्येष्ठ नेते अॅड. एकनाथ आवाड यांचे हैदराबाद येथे निधन झाले. त्यांच्यावर हैदराबाद येथील रुग्णालयात अल्सरवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
‘मानवी हक्क अभियाना’च्या माध्यमातून दलित व वंचितांसाठी संघर्ष करणारे बंडखोर दलित नेते अॅड. एकनाथ आव्हाड यांच्या निधनामुळे दलीत चळवळीचा लढवय्या नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. पोटाच्या अल्सरने त्रस्त असलेले आवाड हैदराबाद येथील एशियन रुग्णालयात उपचार घेत होते. तिथेच सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आवाड यांच्यावर उद्या (मंगळवारी) सकाळी बीड जिल्ह्यातील तेलगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आव्हाड यांच्या निधनामुळे परिवर्तनाच्या लढाईतला बुलंद आवाज हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
आव्हाड यांचा जन्म मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात मातंग कुटुंबात झाला होता. अत्यंत खडतर परिस्थितीत शिष्यवृत्तीच्या बळावर, लोकांच्या मदतीने आव्हाडांनी बी.ए. आणि नंतर एम.एस.डब्ल्यू.चा अभ्यासक्रम पूर्ण केला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते विवेक पंडित यांच्याबरोबर ठाणे जिल्ह्यातील आदिवासींसाठी काम करू लागले. वेठबिगारांच्या प्रश्नावर त्यांनी रान उठवले होते.
‘मानवी हक्क अभियान’ या चळवळीच्या माध्यमातून आवाड यांनी मराठवाड्यातील सुमारे पन्नास हजार दलितांच्या जमिनी वाचविल्या. आव्हाड यांच्या या अभियानामुळे मराठवाड्यातील दलितांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक व सामाजिक स्वातंत्र्य मिळाले. गुलामीचे प्रतीक असलेली गावकीची कामे दलितांनी सोडावीत आणि आत्मसन्मानाने जगावे हा आवाडांच्या चळवळीचा उद्देश होता. त्यासाठी त्यांनी सतत संघर्ष केला. या संघर्षातूनच ‘जग बदल घालुनि घाव’ हे त्यांचे आत्मकथन जन्माला आले. त्यांचे हे पुस्तक चळवळीसाठी मार्गदर्शक ठरले आहे.









