
अहमदनगर – नगरच्या कोतवाली पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या दलित तरुणाचा आज सायंकाळी खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. पोलिसांनी मारहाण केल्याची नातवाईकांची तक्रार आहे. तर पळून जाताना तो जखमी झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
पारनेर तालुक्यातील नितीन बाळू साठे या तरुणाचा मृत्यू झाला आहे. काल रात्री पोलिसांनी त्याला चोरीच्या संशयावरून ताब्यात घेतले होते. चौकशी सुरू असताना शौचाला जातो असे सांगून तो विवस्त्र अवस्थेत पोलिसांची नजर चुकवून पळून गेला होता, असा पोलिसांचा दावा आहे. काही वेळातच पोलिसांनी त्याला पोलिस ठाण्यापासून काही अंतरावरच पुन्हा पकडले होते. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. याची माहिती मिळाल्यानंतर त्याचे नातेवाईक आणि दलित संघटनांच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धाव घेतली आहे. पोलिसांच्या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाला असून पोलिस तो पळून जाताना जखमी झाल्याचा बनाव रचत आहेत, असा आरोप त्याचे नातेवाईक आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.









