दहावीच्या परीक्षेला सुरुवात

6730_ssc-english-exam
मुंबई- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी दहावीची लेखी परीक्षा सोमवारी, ३ मार्च रोजी सुरू होत आहे.
राज्यातील २१ हजार ९ शाळांमधील एकूण १७ लाख ३२ हजार ८९८ विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत. यापैकी ९ लाख ५९ हजार ४५० मुले तर ७ लाख ७३ हजार ४४८ मुलींचा समावेश आहे. राज्यात ही परीक्षा शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांकडून घेण्यात येणार असून ती एकूण ४ हजार २२२ परीक्षा केंद्रावर होईल.
यात मुंबई विभागातून एकूण ३ लाख ८२ हजार ४३७ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. यातील ३ लाख ६० हजार ८३५ हे नियमित विद्यार्थी असून एकूण विद्यार्थ्यांपैकी ३ लाख ६ हजार ८५८ मुले, तर एक लाख ७५ हजार ५७९ मुलींचा समावेश आहे. तर विविध शाळांमधून खासगीरीत्या परीक्षेला ३९ हजार ६३ विद्यार्थी बसणार आहेत. मुंबई विभागीय मंडळात ही परीक्षा ६२९ मुख्य परीक्षा केंद्रांवर आणि १६२ उपकेंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे.
तर कोकण विभागातून ६०५ शाळांतील ४१ हजार ५५५ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. ही परीक्षा १०३ परीक्षा केंद्रांवर घेतली जाईल. यात २१ हजार ७७८ मुले तर १९ हजार ७७७ मुलींचा समावेश आहे.
दहावीची परीक्षा पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार घेण्यात येणार आहे. ऑटिस्टिक (स्वमग्न) विद्यार्थ्यांना यंदा कॅल्क्युलेटर वापरण्याची परवानगी देण्यात आली असून त्यांनाही कर्णबधिर मुलांप्रमाणे एक भाषा अनिवार्य करण्यात आली आहे.
परीक्षा सुरळीत आणि कॉपीमुक्त व्हावी यासाठी मंडळाकडून प्रत्येक जिल्ह्यात सातप्रमाणे एकूण २४५ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. त्यासोबत विशेष भरारी पथके आणि जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली विशेष पथकेही नेमण्यात आली आहेत. तर राज्यातील परीक्षा केंद्रात कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार घडू नयेत यासाठी परीक्षा केंद्राच्या परिसराचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. इंग्रजी, गणित या विषयाच्या पेपरच्या दिवशी बैठे पथक कार्यान्वित करण्यासाठी विभागीय मंडळाच्या माध्यमिक शिक्षणाधिका-यांना सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी दिली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


2 − = zero