
यवतमाळ,दि. २० (पवन लताड) – यवतमाळ वनवृत्तात बिबट मृत्यूची मालिकाच सुरू आहे. गत आठवड्यात दारव्हा वनपरीक्षेत्रात बिबटाचा मृत्यू झाल्याची घटना ताजीच असताना, हातणी-माळेगाव शिवारात आज मंगळवारी पाच वर्षीय बिबट मृतावस्थेत आढळल्याने वनविभागाविरोधात वन्यप्रेमीतून संताप व्यक्त होत आहे.
वनसंपदेने नटलेल्या यवतमाळ वनवृत्तातील आठही वनपरीक्षेत्रात बिबटांचा वास्तव असल्याचे वनविभागाच्या प्राणी गणनेतून स्पष्ट झाले आहे. मात्र वन्य प्राण्यांचे जतन करण्याच्या दृष्टीने वनअधिकारी ठोस पाऊले उचलत नसल्याचे अनेकदा उघड झाले आहे. त्यामुळेच गेल्या काही महिन्यात यवतमाळसह अन्य वनपरीक्षेत्रात बिबटांचा मृत्यू झाला आहे. मात्र यातून अधिकाºयांनी बोध घेतला नसून उपाययोजना केल्या नसल्याने गत आठवड्यात दारव्हा वनपरीक्षेत्रातील ब्रम्हणाथ शिवारात बिबटाचा मृत्यू झाला. ही घटना ताजीच असताना, याच वनपरीक्षेत्रातील माळेगाव शिवारात आज मंगळवारी सकाळी एका गुराख्याला पाच वर्षीय बिबट मृतावस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय वनअधिकारी गवई, वनपरीक्षेत्र अधिकारी नाल्हे, क्षेत्रसाहाय्यक धोतरे घटनास्थळी दाखल झाले. पाच दिवसापूर्वीच या बिबटचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. जंगलात बिबटचा वास्तव असल्याची साधी माहिती देखील वनपरीक्षेत्र अधिकाºयाकडे नसल्यामुळे आठवड्यात दोन बिबटचा मृत्यू झाल्याचा आरोप वन्यप्रमींनी केला आहे. यापूर्वी आढळलेल्या मृत बिबटाचे दोन दात व एक पंजा गायब असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी पाहिले होते. आज आढळलेल्या बिबटाचे अवयव मात्र शाबूत दिसून आले. बिबटचा मृत्यू नेमका कशामूळे झाला याचा उलगडा शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र शवविच्छेदन अहवालच वनविभागाकडून दडपण्यात येतो. कारण यापूर्वी वनवृत्तात मृतावस्थेत आढळलेल्या एकाही बिबटच्या मृत्यूचे कारण अधिकारी सांगू शकलेले नाही.









