
नवी दिल्ली – नव्या सरकारच्या निवडीसाठी दिल्लीमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला दिल्लीकर उस्फूर्त प्रतिसाद देत आहेत. मतदानासाठी विविध मतदान केंद्राबाहेर नागरीकांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे.
संध्याकाळी पाचवाजेपर्यंत सरासरी ६३.४६ टक्के मतदान झाले आहे. आतापर्यंत सहा मतदान यंत्रे बदलण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. उत्तर पूर्व दिल्लीमध्ये सर्वाधिक ६६.३७ टक्के मतदान झाले असून, दक्षिण दिल्लीत त्या तुलनेने कमी ६१.७ टक्के मतदान झाले आहे.
सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरु राहणार आहे. सकाळीच दिल्लीतील राजकीय नेत्यांनी संबंधित मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी, आम आदमी पक्षाचे उमेदवार अरविंद केजरीवाल यांनी सकाळी लवकर मतदानाचे कर्तव्य बजावले. तसेच मोठ्या संख्येने नागरिकांनी मतदानासाठी घराबाहेर पडावे असे आवाहनही केले.
नेत्यांचे मतदान
दिल्लीतील विधानसभेच्या ७० जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीसाठी एकूण ६७३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांचे भवितव्य आज दिल्लीकर मतदानाद्वारे ठरवणार आहेत. उत्तर दिल्लीतील बुरारी मतदारसंघातून सर्वाधिक १८ उमेदवार निवडणुकीसाठी उभे आहेत तर दक्षिण दिल्लीतील आंबेडकर नगर मतदारसंघातून सर्वात कमी चार उमेदवार रिंगणात आहेत.
राज्यभरात एकूण १२ हजार मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी ७१४ संवेदनशील मतदान केंद्रे असून त्यामधील १९१ ही अतिसंवेदनशील मतदानकेंद्रे म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
दिल्लीतील १.३३ कोटी मतदारांना आज मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. यामध्ये ७३ लाख ८९ हजार ०८९ पुरुष मतदार तर ५९ लाख १९ हजार १२७ महिला मतदार आहेत. यासोबतच ८६२ तृतीयपंथी मतदार आहेत. १८ ते १९ या वयोगटातील मतदारांची संख्या दोन लाख २७ हजार ३१६ इतकी आहे. तर ३११ मतदार हे १००हून अधिक वयाचे आहेत. दिल्लीतील मातिया महाल मतदारसंघात सर्वाधिक तीन लाख ४७ हजार २४५ मतदार आहेत. तर चांदनी चौक येथे एक लाख १३ हजार ७७७ मतदार आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात चहावाला
संपूर्ण मतदाप्रक्रियेदरम्यान कोणतीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ६५ हजार पोलीस कर्मचा-यांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. तर मतदान सुरळीत पार पडावे यासाठी निवडणूक आयोगाने ९५ हजार निवडणूक अधिका-यांना कामाला लावले आहे.
१६ वर्षे दिल्लीतील सत्तेपासून दूर राहिलेल्या भाजपासमोर यंदाच्या निवडणुकीत आपचे भलेमोठे आव्हान आहे. अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी चळवळीतील सदस्य राहिलेल्या किरण बेदी यांना भाजपाने मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरवले आहे. त्यामुळे केजरीवाल विरुद्ध बेदी असे दिल्लीतील निवडणुकीचे चित्र आहे.









