
नवी दिल्ली- दिल्लीत एका २४ वर्षीय नराधमाने तीन महिने ते ६ वर्षे वयाच्या १६ मुलींवर बलात्कार करुन नंतर त्यांची निर्घृणपणे हत्या केल्याची कबुली दिली आहे.
एका सहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार आणि हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी रविंदर कुमार (२४) याने चौकशी दरम्यान आतापर्यंत १६ मुलींवर बलात्कार करुन त्यांची हत्या केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी बेगमपूर परिसरातून १४ जुलै रोजी रविंदर कुमार याला अटक केली. चौकशी दरम्यान रविंदरने २००९ पासून आतापर्यंत तीन महिने ते ६ वर्षापर्यंतच्या १६ मुलींवर बलात्कार करुन त्यांची हत्या केल्याची कबुली दिली. रविंदर मूळचा उत्तर प्रदेशमधील बदायूं येथील रहिवासी आहे.
रविंदर कुमार याने २००९ ते जून २०१५ या कालावधीत दिल्ली, हरियाणा आणि उत्तरप्रदेशमध्ये १६ मुलींवर बलात्कार आणि हत्या केल्याचा आरोप पोलिसांनी लावला आहे.
रविंदर हा छोट्या मुलींना चॉकलेटचे आमिष दाखवून त्यांना निर्जनस्थळी घेऊन जात असे. व तेथे तो त्यांच्यावर अत्याचार करुन त्यांची हत्या करून मृतदेह कॅनल किंवा शेतात फेकून देत असे.
१४ जुलै रोजी सहा वर्षीय मुलीची बेपत्ता होण्याची तक्रार पोलिसांकडे आली. बेगमपुरा भागातून बेपत्ता झालेल्या या मुलीचा मृतदेह एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत आढळून आला. या मुलीची बलात्कार करून हत्या करण्यात आली होती.
या ठिकाणी मिळालेल्या चालक परवान्यावरून पोलिसांनी रविंदर कुमारला अटक केली. त्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता या प्रकरणी हा धक्कादायक खुलासा झाल्याचे पोलीस उपायुक्त विक्रमजीत सिंग यांनी सांगितले.









