
नवी दिल्ली (दि. १३ मार्च) – संपूर्ण देशाला हादरवून सोडणा-या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार दोषींची फाशीची शिक्षा कायम ठेवण्याचा निकाल गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयाने दिला. न्यायमूर्ती रेवा खेत्रपाल आणि न्यायमूर्ती प्रतिभा राणी यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला.
१६ डिसेंबर २०१२ च्या रात्री दिल्लीतील एका धावत्या बसमध्ये सहा नराधमांनी मिळून निर्भयावर अत्यंत क्रूर पध्दतीने सामूहिक बलात्कार केला होता. यावेळी निर्भयासोबत असणा-या तिच्या मित्रालाही या सहाजणांनी बेदम मारहाण करुन त्या दोघांना रस्त्यावर फेकून दिले होते. गंभीर जखमी झालेल्या निर्भयाचा २९ डिसेंबर २०१२ रोजी सिंगापूरमधील माऊंट एलिझाबेथ रुग्णालय़ात उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता.
या सहापैकी एक अल्पवयीन आरोपी होता. त्याला तीनवर्षांची शिक्षा झाली. एकाने दिल्लीच्या तिहार तुरुंगात आत्महत्या केली. सप्टेंबर २०१३ मध्ये सत्र न्यायालयाने मुकेश (२६), आकाश ठाकूर (२८), पवन गुप्ता (१९), विनय शर्मा (२०) यांना फाशीची शिक्षा सुनावली. दिल्लीतील या बलात्कार प्रकरणानंतर संपूर्ण देशात संतापाचा एक आगडोंब उसळला होता. दिल्लीतील जनता रस्त्यावर उतरली होती. जन उद्रेक लक्षात घेऊन संसदेने बलात्कारा विरोधातील कायदा अधिक कठोर केला. दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष उपायोजना करण्यात आल्या.









