- नागपूर : होता अंधार युगाचा, आमच्या पावलोपावली… धम्माच्या क्षितिजावर भीम झाला सूर्याची सावली…असे भीमस्तुतीचे गीत ओठांवर सजवून…पंचशीलची पताका खांद्यावर घेऊन ‘जयभीम’च्या जल्लोषात निळ्या पाखरांचे काफिले दीक्षाभूमीवर पोहोचण्याचे सत्र अविरत सुरूच आहे़ शतकानुशतकापासून चालत आलेल्या वर्गव्यवस्थेला जिथे बाबासाहेबांनी मूठमाती दिली ती वैचारिक क्रांतिभूमी कशी असेल याचे काल्पनिक चित्र डोक्यात घेऊन हे अनुयायी देशाच्या कानाकोपऱ्यातून येथे येत आहेत व प्रत्यक्ष दीक्षाभूमीचा भव्य स्तूप बघताच ते येथील माती मोठ्या अभिमानाने कपाळी लावत आहेत़ या अनुयायांमध्ये कुणी फेट्यात भाकरी बांधून बसचा प्रवास करीत आलेला मराठवाड्यातील म्हातारा शेतकरी आहे तर कुणी थेट जपानहून विमानात बसून आलेला तरुण अभियंता आहे़ दीक्षाभूमीवर पोहोचणारे असे विविध प्रांतातील व वेगवेगळ्या क्षेत्रातील असले तरी या सर्वांना एका सूत्रात बांधणारा धम्माचा विचार मात्र सारखाच आहे. याच विचाराच्या प्रचार आणि प्रसारासाठी बाबासाहेबांनी दाखविलेल्या मार्गावर चालण्याचा संकल्प करण्यासाठी ही सारी मंडळी उन्हातान्हाची पर्वा न करता या पवित्र दीक्षाभूमीवर एकवटली आहे़









