
नागपूर , दि. ९ (प्रतिनिधी) – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस दुष्काळाच्या प्रश्नावरुन वादळी ठरला. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी दुष्काळग्रस्तांसाठी तातडीने पॅकेज जाहीर करण्याची मागणी लावून धरली.
विरोधकांनी विधानसभेत हा मुद्दा लावून धरला. यावरुन गदारोळ सुरु राहिल्याने विधानसभेच कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आल आहे. सरकारने आधी दुष्काळग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर करावी नंतर चर्चा करावी अशी विरोधी पक्षांची मागणी आहे. विधान परिषदेच कामकाज चारवेळा तहकूब करण्यात आल.
सकाळी विधानसभेच कामकाज सुरु होताच विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नियम ५७ अंतर्गत प्रश्नोत्तराचा तास निलंबित करुन, दुष्काळाच्या विषयावर चर्चा घेण्याची मागणी केली. मात्र सभापती हरीभाऊ बागडे यांनी त्यांची मागणी फेटाळून लावली.
त्यावर संतापलेल्या विरोधकांनी मोकळया जागेत धाव घेऊन घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे दहा मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. पुन्हा कामकाज सुरु होताच विरोधी पक्षाची सरकार विरोधात घोषणाबाजी सुरु होती. त्यावेळी सभापतींनी घोषणाबाजीकडे दुर्लक्ष करुन, सभागृहाचे प्रश्नोत्तराचा तास सुरु केला.
त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार छगन भुजबळ यांनी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना विरोधी पक्षात असताना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने विरोधी पक्ष नेत्यांना नेहमीच बोलण्याची संधी दिली आहे याची आठवण करुन दिली.









