
यवतमाळ – यावर्षी दुष्काळामुळे शेतकर्यांचे मरणच स्वस्त झाले आहे. हातचे पीक गेल्याने शेतकरी देशोधडीला लागले आहेत. सततची नापिकी, कर्जबाजारीपणामुळे हताश शेतकरी टोकाचे पाऊल उचलत मरणाला कवटाळत आहेत.एकीकडे सरकार हजारो कोटीचे पैकेज व पैकेज देत आहे तर दुसरीकडे उपासमारीला तोंड देत असलेले दररोज दोन दुष्काळग्रस्त शेतकरी चालु अधिवेशनाच्या पहिल्या दोन आठवड्यात आपली जीवन यात्रा आत्महत्या करून संपविली आहे अशा ४० शेतकऱ्यांची नावे विदर्भ जनांदोलन समितीने दिली असुन आज पर्यंत सत्ताधारी वा विरोधकांचा एकही नेता यांच्या दारावर गेला नसुन मात्र हे सारे नेते या दरम्यान विदर्भ दर्शन व भोजनावळीत मग्न असल्याचा आरोप शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केला आहे .
विदर्भात दररोज दोन मराठवाड्यात दररोज तीन शेतकरी आत्महत्या करीत असताना दिल्लीचे सरकार मात्र महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या कमी झाल्या असा दावा करीत आहे हा प्रकार तर शेतकऱ्यांना अधिक निराश करणारा आहे एकीकडे सरकारने कर्ज वसुली रोखली असल्याचा दावा केला आहे तर याउलट बँकांचे कर्मचारी गावांगावात मध्ये नोटीस घेऊन फिरत आहे. कर्मचार्यांनाही शेतकर्यांच्या परिस्थितीची जाणीव आहे. परंतु त्यांचाही नाईलाज आहे. वरिष्ठ अधिकारी मात्र याकडे लक्ष द्यायला तयार नाही.
शेतकर्यांना दोन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा चांगलाच फटका बसत आहे. सुरूवातीला अतवृदष्टी. गारपिट आणि नंतर यावर्षीखरिपात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकर्यांच्या हातात काहीच लागले नाही. त्यातच जे पीक आले त्यांना भावच मिळत नाही. दुबार-तिबार पेरणी करूनही अपुरा पाऊस आल्याने संपूर्ण खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला. गतवर्षी ज्यांना १०० पोते सोयाबीन झाले त्यांना यंदा दोन क्विंटलही सोयाबीन झाले नाही. महागडे बियाणे, निंदण, खुरपण करून पीक शेतात बहरले होते. मात्र किडी आणि दुष्काळी परिस्थितीने संपूर्ण शेत उद्ध्वस्त झाले आहे. आता या शेतकर्यांना बँका त्रस्त करून सोडत आहे. अनेकांनी पेरणीसाठी पीक कर्ज घेतले होते. काहींनी ट्रॅक्टर तर काहींनी मोटरसायकलसाठी कर्ज घेतले होते. परंतु दुष्काळी परिस्थितीने कर्ज फेडू शकले नाही. बँकांनी आता वसुली मोहीम सुरू केली आहे.









