
मुंबई- स्वच्छ प्रतिमेचा, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असावेत अशी सामान्य मतदारांची आपेक्षा असते. मात्र प्रत्यक्षात विविध राजकीय पक्षांकडून गुन्हेगारी, भ्रष्टाचाराची लोकांना उमेदवारी दिली जाते.
१७ एप्रिल रोजी राज्यात दुस-या टप्यात १९ लोकसभा मतदानसंघात मतदान होणार आहे. या १९ जागांवर ३४६ उमेदवार उभे आहेत. यापैकी ४४ जणांवर खुन, खुनाचा प्रयत्न आणि बलात्कारासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. एकूण उमेदवारांमध्ये हे प्रमाण १३ टक्के असल्याचे दिसून येते. तर ७१ जणांवर म्हणजेच २१ टक्के उमेदवारांवर विविध गुन्हे दाखल आहेत.
मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात दुस-या टप्प्यात मतदान होत आहे. राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना उमेदवारी दिल्याचे महाराष्ट्र इलेक्शन वॉच या संस्थेने म्हटले आहे.
राष्ट्रवादीचे उस्मानाबादमधील उमेदवार पद्मसिंह पाटील, हातकणंगलेमधील स्वाभीमान शेतकरी संघटनेचे उमेदवारी राजू शेट्टी आणि संदीप मोजर या उमेदवारांवर खुनाचे गुन्हे आहेत. शिरुरमधील शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव पाटील यांच्यावर देखील खुनाचा गुन्हा आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार उदयराजे भोसले यांच्यावर देखील खुन आणि अपहरणाचे गुन्हे दाखल आहेत.
विशेष म्हणजे स्वच्छ प्रतिमेचे उमेदवारांना उमेदवारी देऊ असे सांगणा-या ‘आप’च्या पाच उमेदवारांवर देखील गुन्हे असल्याचे समोर आले आहे. यापैकी मावळ लोकसभा मतदारसंघातील मारुती भापकर यांच्यावर गंभीर गुन्हे आहेत.









