
नवी दिल्ली – उमेदवारांच्या प्रचार खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने नेमलेल्या निवडणूक निरिक्षकांच्या वेगवेगळया पथकांनी देशभरातून आतापर्यंत १९५ कोटी रुपयांहून अधिक रक्कम जप्त केली आहे.
निवडणूक काळात आंध्रप्रदेशात सर्वाधिक पैशांचे गैरव्यवहार सुरु असून, आंध्रप्रदेशातून आतापर्यंत ११८ कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. तामिळनाडूतून १८.३१ कोटी, महाराष्ट्रातून १४.४० कोटी, उत्तरप्रदेशातून १०.४६ कोटी, पंजाबमधुन चार कोटी त्याशिवाय अन्य राज्यांमधुन काही लाखांच्या रक्कमा जप्त केल्या आहेत. पैशाबरोबरच मद्यही मोठया प्रमाणात जप्त करण्यात आले आहे. देशभरातून २६.५६ लाख लिटर मद्य आणि ७० किलो हेरॉईजन जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी निवडणूक आयोगाने वेगवेगळया राज्यांमध्ये ११,४६९ प्राथमिक तक्रारी दाखल केल्या आहेत. निवडणूक काळात काळया पैशाचा वापर रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने निवडणूक खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष निरिक्षकांची नियुक्ती केली आहे.









