आर्णी – तालुक्यातील केळझरा (कोमटी) येथील दोन सख्ख्या तरूण भावंडांचे मृतदेह आज सकाळी शेतात आढळून आल्याने गावात खळबळ उडाली आहे. प्रमोद (२४) व प्रवीण उत्तम पवार (२०) अशी मृतकांची नावे असून विजेचा धक्का लागून त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
हे दोघेही भाऊ २० मेच्या रात्री मक्त्याने केलेल्या शेतात जागलीसाठी गेले होते. आज २१ मे च्या सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास त्यांचे मृतदेह भूषण भगत यांच्या शेतात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार सर्जेराव गायकवाड यांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी आर्णी येथे पाठविले.









