दोन-अडीच वर्षात राज्यात पुन्हा निवडणुका- शरद पवार

sharad-pawar
मुंबई – ‘मुंबई महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या की शिवसेना-भाजप युती सत्तेत राहणार नाही. त्यामुळं दोन-अडीच वर्षात राज्यात पुन्हा निवडणुका होतील,’ असं भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी वर्तवले.
वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. पवार यांनी यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह भाजपवर तोफ डागली. ‘नारायण राणे दिसायला लहान आहेत पण कर्तृत्वाने महान आहेत. युतीच्या राजवटीत बाळासाहेबांनी मनोहरपंत जोशींना बाजूला करून, नारायण राणे यांना मुख्यमंत्रिपद दिले होते. जे बाळासाहेबांना कळलं ते आताच्या पिढीला कळते की नाही ते माहीत नाही, असा टोलाही पवार यांनी हाणला.
‘बाळासाहेबांची सेना ही मर्दांची सेना होती,’ असेही पवार म्हणाले. आपल्या भाषणात त्यांनी केंद्राबरोबरच राज्यातील राज्यकर्त्यांनाही लक्ष्य केले. ‘खूप अपेक्षा होत्या देशवासीयांच्या; पण सुरुवात चांगली झालेली नाही. राज्य ज्यांच्या हातात दिले ते कसे, कोणासाठी चालवत आहेत तेही तुमच्यासमोर आहेच,’ असं सांगतानाच, वांद्रे पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणूक ही बदलांची सुरुवात आहे,’ असं पवार म्हणाले. ‘काँग्रेसशी आमचेही कधी कधी मतभेद झाले असतील तरीही देशाला स्वातंत्र्य देणाऱ्या नेत्यांनी काँग्रेस घडवली आहे. त्यामुळे मोदी यांची देश काँग्रेसमुक्त करण्याची घोषणा सत्तेचा माज दर्शविते’, असे पवार म्हणाले.
‘महाराष्ट्रात गायीच्या हत्येवर बंदी होती. गायीचा आपण सन्मानच करतो, पण बैल थकले, म्हणूनच शेतकरी त्यांना विकतो. तुम्ही शेतकऱ्यांना या बैलांना सांभाळण्याचा भत्ता द्या,’ अशी सूचना पवार यांनी केली. यूपीएच्या राजवटीततील भूसंपादन कायद्यात जमीन संपादनासाठी ७० टक्के शेतकऱ्यांची अनुमती​ आवश्यक होती. पाच वर्षे संपादित केलेली जमीन त्याच कारणासाठी वापरली नाही तर मूळ शेतकऱ्याला पुन्हा देण्याची तरतूद होती. त्याला भाजपची संमती होती. मग आता बदल का? असा सवाल त्यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


+ five = 11