
दिग्रस, दि. १२ – क्षुल्लक कारणातून दोन गट आमने-सामने आल्याने मारहाण करण्यात आली. यामुळे गावात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. ही घटना तालुक्यातील लाख येथे घडली. आज पोलीस व ग्रामस्थांनी मध्यस्थी करून दोन गटातील तणाव निवळला.
खरकटे पाणी अंगणात टाकण्याच्या कारणातून मारहाण केली. कलिम खान याच्यासह अन्य तिघांनी मारहाण करून जखमी केले. तसेच जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. सूरज गुलाब सुरोशे याने याप्रकरणी दिग्रस पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी कलीम खान अमजत खान, दिलदार खान, मुश्ताक शेख फरीद यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. टिव्हीचा केबल हलविल्याच्या वादातून घरात घुसून नऊ जणांनी मारहाण केल्याची तक्रार तयरणबी कलीम खान हिने पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून पोलिसांनी प्रकाश राऊत, चंद्रकांत राऊत, सुरेश सुरोशे, मोरेश्वर सुरोशे, सुमित काळे, सुमित ढोरे, राजू कोहोळ, सचिन सातव, अनंता ढोरे, विनोद चव्हाण यांच्याविरूद्ध गुन्हा नोंद केला. ही घटना काल सायंकाळी ६.३० वाजता घडली होती. मात्र तणाव सदृशस्थिती निर्माण झाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना भराडे, पोलीस निरीक्षक ठाणेदार गायकवाड, ठाणेदार संजय देशमुख घटनास्थळ गाठून जमावाची समजूत काढली. त्यानंतर तणाव निवळला.









