धर्म आणि दहशतवादाची सांगड जगाने फेटाळावीः नरेंद्र मोदी

index
वृत्तसंस्था, ने पी तॉ (म्यानमार)
‘धर्म आणि दहशतवाद यांची सांगड जगाने फेटाळली पाहिजे. त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी खरीखुरी आंतरराष्ट्रीय भागीदारी झाली पाहिजे,’ असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.
पूर्व आशिया परिषदेत ते बोलत होते. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांच्यासह १८ देशांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते. ते म्हणाले, ‘सायबर आणि अवकाश क्षेत्र ही दहशतवादाची नवी अवतारे न राहता संपर्काची साधने म्हणूनच राहिली पाहिजेत याची दखल घेतली पाहिजे. इस्लामिक स्टेटविरुद्ध (आयसिस) परिषदेने केलेल्या ठरावास आमचा पाठिंबा आहे. पण त्याचवेळी सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी खरीखुरी आंतरराष्ट्रीय भागीदारी झाली पाहिजे. ज्यांचा मानवतेवर विश्वास आहे त्यांनी एकत्र आले पाहिजे.’दहशतवाद आणि अतिरेकीवादाचे आव्हान वाढत असल्याचे सांगून मोदी म्हणाले, ‘या सर्वांचा अमली पदार्थांचा व्यापार, शस्रात्रांची चोरटी वाहतूक आणि हवाला व्यवहाराशी संबंध आहे.’
मोदी यांनी आपल्या भाषणात पूर्व आशियाला भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नांचा उल्लेख केला. चीनचा उल्लेख न करता दक्षिण चायना समुद्रातील हालचालींवरही त्यांनी निवेदन केले. ते म्हणाले, ‘पूर्व आशियात अनेक न सुटलेले आणि गुंतागुंतीचे प्रश्न आहेत. त्यावर विचार झाला पाहिजे. विभागातील देशांमध्ये समजूतदारपणे वातावरण आणि विश्वास कायम राहिण्यासाठी सातत्यपूर्ण चर्चा सुरू राहिली पाहिजे. परस्परावलंबी आणि जागतिकीकरणाच्या काळात आंतरराष्ट्रीय कायदे आणि नियम पाळण्याशिवाय पर्याय नाही. सागरी सुरक्षेलाही ते लागू होते. त्यामुळेच दक्षिण चायना समुद्रात शांतता आणि स्थैर्य राहण्यासाठी आंततराष्ट्रीय नियमांचे पालन झाले पाहिजे. १९८२ मध्ये राष्ट्रसंघाने सागरी हालचालींबाबत कायदा केला आहे. त्याच्या आधारानेच हा प्रश्न सुटला पाहिजे. नियमांचे पालन करून एकमताने हा प्रश्न सोडविता येईल अशी खात्री आहे.’आर्थिक विषयावर बोलताना मोदी यांनी विभागीय व्यापक आर्थिक भागीदारी कराराचा आग्रह धरला. यामुळे विभागीय एकता आणि संपन्नतेला चालना मिळेल असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


+ five = 13