
यवतमाळ, दि. २१ – साध्वी, महाराजांकडून सुरू असलेले वक्तव्य राष्टÑहिताचे मुळीच नाही. धार्मिक अहंकारापेक्षा देशाचा सन्मान मोठा आहे, अशा शब्दात पिरिपाचे अध्यक्ष आ. प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी टीका केली. विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
अल्पसंख्याक समाजाचे नैतिक रक्षण करण्याची जबाबदारी बहुसंख्य समाजावर असते. दुर्देवाने मात्र सध्या गळचेपी धोरण सुरू आहे. देशात असेच सुरू राहिले तर अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही, अशा इशारादेखील आ.प्रा.कवाडे यांनी दिली. २६ जानेवारीच्या जाहिरातीमधून भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकात असलेले धर्मनिरपेक्ष व समाजवाद हे शब्द वगळण्यात आले. हा देशाची अखंडता व एकात्मतेवर घाला घालण्याचा प्रयत्न आहे. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे यांच्या हत्येमागे गोडसेप्रवृतीचा हात असल्याचा आरोपही आ. कवाडे यांनी केला. रिपब्लिकन ऐक्य झाल्यास पक्षाचे विलिकरण करण्यात यावे, त्यासाठी माझा सर्वप्रथम पुढाकार असेल. प्रत्येकाने निवडणूक आयोगाकडून गटाची मान्यता रद्द करून घ्यावी, रिपब्लिकन ऐक्यासंदर्भात विचारलेल्या एका प्रश्नावर भूमिका स्पष्ट केली. यावेळी विदर्भ अध्यक्ष चरणदास इंगोले, खडसे, कृष्णा परिपगार, कृष्णा रंगारी, रवी श्रीरामे, सुरेश मेश्राम, यू.पी. इंगोले, बंडू तागडे यांच्यासह पीरिपाचे पदाधिकारी उपस्थित होते.









