
मुंबई, दि. १३ – मुंबईत ‘नाईट लाईफ’ सुरु करण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली असतानाच न्यायालयाने त्याआधी सरकारला खडे बोल सुनावीत चांगलेच फटकारले आहे. नाईट लाइफ सुरु झाल्यास रात्रभर मद्याची दुकाने व पब सुरु ठेवणार आहात का ? जर रात्रभर दुकाने उघडी ठेवली तर महिलांच्या सुरक्षाच्या आढावा राज्य सरकारने घेतला आहे का? असा प्रश्न विचारीत आधी महिलांच्या सुरक्षेचा आढावा घ्या मग नाईट लाइफ सुरु करा असा सल्ला न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे.
मुंबईतील गेल्या काही दिवसांतील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने स्वत:हून खटला दाखल करुन घेत उच्च न्यायालयात त्यावर सुनावणी सुरु आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत निवृत्त न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने डान्सबार बंदीमुळे महिलांवरील होणारे अत्याचार कमी झाल्याचे अहवालात म्हटले आहे. अशा पार्श्वभूमीवर मुंबईत ‘नाइट लाइफ’ सुरु करण्याचा राज्य सरकार विचार करत आहे. पण मद्याची दुकाने आणि पब रात्रभर सुरु राहणार आहेत का? संख्य कमी असल्याने पोलिस यंत्रणेवर आधीच दबाव असल्याचे माध्यमांमधून समोर येत आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणा ‘नाइट लाइफ’ वेळी महिलांना सुरक्षा देण्यास सक्षम आहेत का? आणि सरकारने असा निर्णय घेतला असेल तर रात्रीच्या वेळी महिलांच्या सुरक्षेचा आढावा घेतला आहे का? असे सवाल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केले. तीन आठवडयात प्रतिज्ञापत्र सादर करा व विविध तंज्ञामार्फत आढावा घ्यावा असे आदेश सरकारला दिले. जोपर्यंत उच्च न्यायालयाचे समाधान होत नाही तोपर्यंत सरकारने नाईट लाइफच्या निर्णयाची अंमलबजावणी करु नये असे आदेश न्यायालयाने सरकारला दिले आहेत. न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे मुंबईतील नाईट लाइफ बारगळण्याची शक्यता अधिक आहे.









