नागपुरात तीन कुख्यात गुंड भावांची निर्घृण हत्या

images..
नागपूर – जुगाराच्या पैशांवरून झालेल्या भांडणात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तीन भावांचा वस्तीतील मुलांनीच चाकू, तलवारीने भोसकून खून केला. ही घटना गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास बिडी पेठ भागात घडली. एकनाथ उगले, केशव उगले संजय उगले अशी मृतांची नावे आहेत.
एकनाथ हा अफजल अली नावाच्या गुंडासोबत भागीदारीमध्ये काम करत होता. त्याच्याविरुद्ध ‘मकोका’अंतर्गत गुन्हेही दाखल आहेत, तर केशव आणि संजय हे अण्णा राऊत नावाच्या गुंडासाठी बिडी पेठ वस्तीमध्ये जुगार अड्डे चालवायचे. या तिन्ही भावांची या वस्तीत मोठ्या प्रमाणावर दहशत होती. सामान्य नागरिक त्यांच्या जाचाला कंटाळले होते.
गुरुवारी हे तिघेही भाऊ वस्तीतील एका मित्राच्या मुंडण कार्यक्रमासाठी नागपूर-भंडारा मार्गावरील वागोळा या ठिकाणी गेले होते. त्या ठिकाणी कार्यक्रम सुरू असताना तिघाही भावांनी जुगाराचा डाव रचला. त्या वेळी पैशांवरून त्यांचा काही युवकांशी वाद झाला. या वादामुळे वस्तीतील युवक कार्यक्रम सोडून नागपुरात परतले.रात्री तिघेही भाऊ घराकडे येताना दिसताच एका चौकातील पान ठेल्यावर चाकू, तलवारींसह उभ्या असलेल्या युवकांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. यात एकनाथ आणि केशव हे जागीच ठार झाले, तर संजयने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र युवकांनी त्यालाही संपविले. दरम्यान, सर्व आरोपी फरार आहेत.
गुंड संपवण्याचे सत्रच
गेल्याकाही वर्षात नागपुरात कुख्यात गुंडांची हत्या करण्याचे सत्रच सुरू झाले आहे. अक्कू यादव, पिंटू शर्के या गुंडांचा भर कोर्टात खून करण्यात आला होता. मार्च २०१३ रोजी कुख्यात गुंड इक्बाल याला विद्यापीठाच्या इमारतीसमोर महिलांनी दगडाने ठेचून हत्या केली होती. तो झोपडपट्टीतील महिलांची छेड काढायचा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


× four = 4