
नागपूर – उत्तर भारतात भूकंपाचे तीव्र झटके जाणवले असून काही ठिकाणी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या भूकंपाचे सौम्य धक्के महाराष्ट्रातील विदर्भात जाणवले आहे. उपराजधानी नागपूर शहरही भूकंपाच्या आवाजाने हादरले. त्यामुळे नागरिकांनी सर्वत्र चर्चा सुरु केली असून हे भूकंपाचेच धक्के असल्याचे स्पष्ट झाले आहे.
उत्तर भारतील बिहार, उत्तरप्रदेश, झारखंड येथे ७.५ रिस्टर स्केलचा तीव्र भूकंपाचा झटका बसल्याने देशभरात एकच धांदल उडाली आहे. सुरुवातीला जमिन हादरुन गूढ आवाज झाला. त्यामुळे नागिराकांत भितीचे वातावरण निर्माण झाले. भूकंपाच्या आवाजाने नागरिक घर आणि ऑफिसमधून सैरा-वैरा पळत मोकळ्या जागी येऊन स्वत:चा बचाव करत होते. जवळपास दीड मिनिटे हा भूकंपाचा थरार नागरिकांनी अनुभवला. नेपाळ हे भूकंपाचा केंद्रबिंदू मानण्यात येत असून महाराष्ट्रातील विदर्भातही भूकंपाचा सौम्य हादरा बसला आहे. दरम्यान भूंकपाच्या धक्क्यांनंतर लातुरमधील किल्लारी भूकंपाच्या आठवणी ताज्या करत नागरिकांत चर्चाच-चर्चा सुरु झाली आहे.









