
मुंबई- कोण आला रे कोण आला .. काँग्रेसचा वाघ आला. काँग्रेस पक्षाचा विजय, नारायण राणे आगे बढो .. हम तुम्हारे साथ है.. अशा गगनभेदी घोषणांनी वांद्रे पूर्व परिसर दणाणून गेला. सर्व जातीधर्मातील लोकांच्या उपस्थितीत, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि प्रत्येकाच्या मनात जिंकण्याचा निर्धार, अशा उत्साही वातावरणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी वांद्रे पूर्व विधानसभा मतदार संघातील पोट निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज मंगळवारी दाखल केला. यावेळी काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (गवई) गटाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. पहिल्या मिरवणुकीतच वांद्रे पूर्वचे वातावरण पूर्णपणे काँग्रेसमय होऊन गेले.
वांद्रे पूर्व विधानसभा पोट निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, अशी माहिती मिळताच या भागातील सर्व जाती, धर्म आणि वेगवेगळ्या प्रांतातील लोक मोठ्या संख्येने जमा झाले. खेरवाडी नाक्यावरून मिरवणुकीने नारायण राणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाले तेव्हा काँग्रेसच्या झेंड्यांनी वातावरण फुलून गेले होते. कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. या मिरवणुकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण, विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे, मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम, खासदार भालचंद्र मुणगेकर, आमदार नसीम खान, माजी मुंबई प्रदेशाध्यक्ष कृपाशंकर सिंह, माजी खासदार प्रिया दत्त, आमदार वर्षा गायकवाड, आमदार जनार्दन चांदूरकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट)चे राजेंद्र गवई, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संजय दिना पाटील, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष सचिन अहिर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश कार्याध्यक्ष आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे यांच्यासह काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस – आरपीआय (गवई गट)चे हजारो कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणूक जसजशी पुढे सरकत होती, तसे रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून लोक नारायण राणे यांना शुभेच्छा देत होते. अनेकांनी पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन राणे यांना शुभेच्छा दिल्या. निवडणूक कार्यालयाजवळ मिरवणूक पोहचली तेव्हा खेरवाडी, भारत नगर, बेहराम पाडा, एमआयजी कॉलनी, शासकीय वसाहतीतील हजारो लोक जमा झाले होते. सर्वांना अभिवादन करून नारायण राणे यांनी निवडणूक कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.









