नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मद्यविक्री दुकानांवर कार्यवाही – राहुल रंजन महिवाल

unnamed
यवतमाळ दि. 13 : परवानाधारक मद्यविक्री दुकानांना शासनाने निर्धारित करून दिलेल्या वेळेतच मद्यविक्री करणे किंवा दुकाने उघडी ठेवने आवश्यक आहे. मात्र नियमांचे उल्लंघन करत जिल्ह्यातील काही दुकाने रात्री उशीरापर्यंत तर सकाळी लवकर मद्यविक्री करत असल्याच्या तक्रारी आहे. या विक्रेत्यांनी वेळेच्या बाबतीत नियमांचे उल्लंघन केल्यास परवाना रद्द करण्यासारखी कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांनी आज गार्डन हॉल येथे विविध कामांचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सुचना केल्या. बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, डॉ.राजेश अडपावार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित काही दुकानांमध्ये सकाळीच मद्यविक्री होत असल्याने त्याचे वाईट परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. काल पालकमंत्र्यांनीही जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत या विषयावर चर्चा केली होती. त्या अनुषंगाने अशाप्रकारे मद्यविक्रीची दुकाने आढळून आल्यास कार्यवाही करण्यासोबतच अशा दुकानांवर अचानक धाडी घालण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांना केल्या. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विषयांचाही आढावा घेतला. तहसिल कार्यालयांमध्ये प्रतिक्षालय बांधण्याचे नियोजन असून त्यासाठी बांधकाम विभागाने 15 दिवसात अंदाजपत्रक सादर करावे. पुरसंरक्षक भिंती बांधकामास प्रादान्य दिल्या जावे, अशा सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. जिल्ह्यातील प्रत्येक विभागाने आपापल्या विभागाचे व्हिजन डॉक्युमेंट सादर करण्यासोबतच वैशिष्टयेपुर्ण कामे घेण्याबाबत प्रस्ताव द्यावा, असे ते म्हणाले.अतिक्रमण मोहिमेतंर्गत दुकाने हटविलेल्या छोट्या व्यावसायिकांचे पुणर्वसन करणे आवश्यक आहे. त्यासाठी योग्य जागेची निवड करण्यासोबतच सदर पुनर्वसन कशा पध्दतीने करता येईल यासाठी नियोजन करण्याचा सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितास केल्या. वन जमीनीवरील लीज पट्टे, राजस्व अभियानाअंतर्गत दिनांक 23 जानेवारी रोजी जिल्हाभर घेण्यात येणाऱ्या महाशिबीराबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला.तत्पुर्वी जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत चालु वर्षातील कामांचा आढावा घेतला. आर्थिक वर्ष संपायला काही महिनेच शिल्लक असल्याने कामांना गती देण्यासोबतच निधी शिल्लक राहणार नाही याची दक्षता घेण्याबाबत त्यांनी संबधीतास सांगितले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील वर्षाच्या नियोजनाचा तसेच यंत्रणांकडून प्राप्त प्रस्तावांचाही आढावा घेतला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


− four = 3