निराश होऊ नका, चित्र पालटेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6
यवतमाळ,दि. 4 : शेती व्यवसायात उत्पादनाच्या तुलनेत खर्चाचे प्रमाण अधिक आहे. खर्चाची ही शेती अधिक नफा आणि फायद्यात कशी आणता येईल, यासाठी शासन प्रयोग राबवित आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांचा माल थेट प्रक्रीया उद्योगांना विकण्याची व्यवस्था होणार आहे. शासन प्रामाणिक आणि संवेदनशिलपणे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशिल आहे. शेतकऱ्यांनी कृपया निराश होऊ नये. शासनावर विश्वास ठेवा. आजूबाजूच्यांना सांगा. येत्या काळात परिस्थिती निश्चितपणे पालटणार आहे, असा भावनिक संवाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधतांना केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यातील घोडखिंडी व पिंपरी बुट्टी या गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी मनमोकळेपणाने त्यांनी गावकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी पालकमंत्री संजय राठोड, आ.मदन येरावार, आ.राजु नजरधने, आ.डॅा.अशोक उईके, प्रधान सचिव प्रविण परदेशी, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.मल्लिनाथ कलशेट्टी आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांना वेळेवर पथपुरवठा होणे आवश्यक आहे. यवतमाळ जिल्ह्यात विविध कारणास्तव अर्धे शेतकरी संस्थात्मक कर्ज पुरवठ्यापासून वंचित आहे. थकीत कर्जाचे पुनर्गठण केल्यानंतर ते व्याजासह भरावे लागते. सदर पुनर्गठण दिर्घ मुदतीत कसे करता येईल सोबतच यातील काही भाग शासनास भरता येईल का? याचाही विचार करावा लागेल. ग्रामीण भागात कर्ज पुरवठ्याच्या संस्था उपलब्ध नसणे हे सुध्दा शेतकऱ्यांच्यादृष्टीने त्रासदायक आहे. यावर तोडगा काढण्यासाठी येत्या काळात पथपुरवठा संस्थांचे जाळे उभारणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
शासन शेतकरी तथा सर्वसामान्यांच्या हितासाठी विविध प्रकारच्या योजना राबवित असते. योजनांवर खर्च होणारा जनतेचा पैसा जनतेच्या कामी योग्यप्रकारे लागतो आहे का? तसेच विविध योजनांच्या अंमलबजावणी तपासण्यासाठी सॅटेलाईट यंत्रणा लवकरच उभी राहणार आहे. नापिकीमुळे शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागतो. त्यासाठी दिर्घकालीन उपायांसोबतच जलयुक्त शिवार अभियानांतर्गत तातडीच्या उपाययोजना करण्यात येणार आहे. येत्या जुनपर्यंत शेतकऱ्यांच्या बांधावर किमान ओलावा तयार होतील यादृष्टीने विविध कामे घेण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांचा माल थेट प्रक्रीया उद्योजकांना विकण्यासाठी त्यांच्याशी बोलणी सुरु असल्याचे ते म्हणाले.
लवकरच प्रत्येक कुटुंबाचे सुक्ष्म सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणातून ज्या बाबी समोर येतील त्या आधारावर नविन योजना राबवून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. जिल्ह्यात प्रलंबित सिंचन विहिरी जुनपर्यंत पुर्ण करून त्यांना विज जोडण्या दिल्या जातील. यासाठी निधीची कमतरता नसल्याचेही त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या विधवा महिलांशी संवाद
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी बुट्टी येथे गावकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळेत गावातील शेतकऱ्यांच्या विधवा महिलांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या महिलांकडून त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. यावेळी दहा कुटुंबांना कुठलीच मदत मिळाली नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावेळी त्यांनी तात्काळ सदर महिलांना कुठल्या योजनेतून लाभ देता येईल ते पाहण्याच्या सुचना यावेळी संबंधीतांना केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


1 − one =