
यवतमाळ – शुक्रवारपासून बेपत्ता असलेल्या दोन तरुणांचे मृतदेह आज येथील निळोणा धरणात आढळल्याने एकच खळबळ उडाली़ अश्वजीत हर्षवर्धन ठमके (२१), पंकज भिमराव राजगडकर (१८) रा. बांगर नगर अशी मृतकांची नावे आहेत़
शुक्रवारी ११ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता ते घरुन निघुन गेले होते. दरम्यान दुपारी ३ वाजून गेल्यानंतरही ते घरी न परतल्याने नातेवाईकांनी शहर पोलीस ठाणे गाठून दोनही युवक बेपत्ता असल्याची तक्रार दिली. दरम्यान आज शनिवारी सायंकाळी निळोणा धरणात दोन युवकांचे मृतदेह तरंगतांना आढळले़ या बाबतची माहिती वडगाव रोड व ग्रामीण पोलिसांना कळविण्यात आली. त्यावरुन वडगाव रोडचे ठाणेदार सुर्यकांत राऊत, ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक अंकुश राठोड, सहा. पोलीस उपनिरीक्षक यु.एन. पाटील यांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा करुन मृतदेह पाण्याबाहेर काढल्यानंतर ते अश्वजीत व पंकजचे असल्याचे उघड झाले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने व शहरचे ठाणेदार अरुण आगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे़









