

यवतमाळ, दि. 12 : येथील निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांचे आनंदी रहा-यशस्वी व्हा हे पुस्तक नुकतेच अमरावती येथे प्रकाशित झाले आहे. हे त्यांचे आतापर्यंतचे सहावे पुस्तक आहे. प्रशासनात जबाबदार अधिकारी म्हणून काम करत असतांनाच त्यांनी आपल्यातील लेखकही टिकवून ठेवल्यानेच त्यांचे सहावे पुस्तक प्रकाशित होवू शकले. या पुस्तकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सदर पुस्तक अमरावती येथील मिशन आयएएसचे प्राध्यापक डॉ.नरेशचंद्र काठोडे यांनी प्रकाशित केले असून पुस्तकास त्यांचीच प्रस्तावना आहे.
श्री.खवले यांची आतापर्यंत एकूण सहा पुस्तके प्रकाशित झाली आहे. त्यात चला आपले गाव तंटामुक्त करू या, तंटामुक्त गावाची गिता वंदनीय राष्ट्रसंतांची ग्रामगिता, कौटुंबिक हिंसाचार अधिनियम-प्रश्नोत्तर स्वरूपात, प्रेरणा स्पर्धा परिक्षेची, विचारांची फुले व आता आनंदी रहा-यशस्वी व्हा या पुस्तकांचा समावेश आहे. यातील प्रेरणा स्पर्धा परिक्षेची हे पुस्तक राज्याचे मुख्य सचिव जे.पी.डांगे यांच्याहस्ते प्रकाशित झाले होते.आनंदी रहा यशस्वी व्हा हे पुस्तक जीवन जगतांना त्यात सकारात्मकता आणण्यासोबतच आयुष्यातील छोट्यामोठ्या प्रसंगांना कसे समोर जावे याबाबत विविध अंगाने प्रकाश टाकण्यात आला आहे. दैनंदिन धकाधकीचे जीवन म्हणजेच केवळ आयुष्य नव्हे. या आयुष्यासोबतच मुक्त आणि म्हणाला आनंद देणारे आयुष्य जगण्याचा टिप्स या पुस्तकातून वाचकांना सहजच कळेल या पध्दतीने देण्यात आला आहे. यापुर्वी त्यांची प्रकाशित पुस्तके महिन्याभराच्या आत संपल्याचा अनुभव आहे. हे पुस्तकही त्याच दिशेन वाटचाल करीत आहे. पुस्तकांच्या स्वरूपात मानधन मिळालेली रक्कम श्री.खवले हे गरीब विद्यार्थ्यांसाठी त्यांना स्पर्धा परिक्षेची तयारी करता यावी म्हणून चालविण्यात येत असलेल्या मिशन आयएस या संस्थेला दान देतात. या पुस्तकाचे मानधनही त्यांनी नुकतेच संस्थेला दिले आहे.









