
नवी दिल्ली – मुंबई किनाऱ्यावर भारतीय नौदलाच्या ‘सिंधुरत्न’ या पाणबुडीला झालेल्या अपघातानंतर नौदल प्रमुख अॅडमिरल डी. के. जोशी यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. संरक्षण मंत्रालयाने त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. सध्या नौदलाचे व्हाइस अॅडमिरल रॉबिन धवन यांच्याकडे प्रभारी कार्यभार सोपविण्यात आला आहे. संरक्षण मंत्री ए. के. अँटनी हे सुद्धा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
‘सिंधुरक्षक’ या नौदलाच्या पाणबुडीला झालेल्या अपघाताच्या आठवणी ताज्या असतानाच, पुन्हा एकदा मुंबईजवळ भारतीय नौदलाच्या ‘सिंधुरत्न’ या पाणबुडीला अपघात झाला आहे. या पाणबुडीवर एकूण ९४ जण होते. यातील ७ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ६० जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. दोन नौदलच्या अधिका-यांचा अद्याप थांगपत्ता लागत नसल्याचे कळते. परंतु बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर याबद्दल ठोस माहिती मिळेल.सिंधुरत्न ही भारताची ३५ वर्ष जुनी पाणबुडी आहे. डागडुजी झाल्यानंतर तपासणीसाठी पाणबुडी समुद्रात नेली असतानाच हा अपघात झाला. याआधी रशियातून आधुनिकीरण करुन आणलेल्या सिंधुरक्षक पाणबुडीला अपघात झाला होता. तसेच आयएनएस बेतवा युद्धनौकेलाही अपघात झाला होता.फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच ऐरावत या युद्धनौकेला किरकोळ अपघात झाला होता. या घटनेनंतर ऐरावतच्या कमांडिंग ऑफिसरची बदली करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांतच सिंधुरत्न पाणबुडीला अपघात झाल्यामुळे संरक्षण मंत्रालयाने या अपघातांची गंभीर दखल घेतल्याने या घडामोडी घडल्या असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.









