
नवी दिल्ली – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्वफेरीत भारताने बांगलादेशचा थोडयाथोडक्या नव्हे तर, तब्बल १०९ धावांनी दारुण पराभव केला. मात्र आपला पराभव टीम इंडियाने नव्हे तर, पंचांनी केला अशी बांगलादेशमध्ये अनेकांची भावना आहे.
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनीही आयसीसीचे अध्यक्ष मुस्तफा कमाल यांचीच ‘री’ ओढत पराभवासाठी पंचांना जबाबदार धरले आहे. पंचांनी चूक केली नसती तर, भारताला बांगलादेशला हरवता आले नसते.
पंचांच्या चूकीमुळे भारताला उपांत्यफेरी गाठता आली असे शेख हसीना यांनी म्हटले आहे. शुक्रवारी आयसीसीचे बांगलादेशी अध्यक्ष मुस्तफा कमाल यांनी वर्ल्डकप भारताने जिंकावा यासाठी फिक्सिंग झाल्याचा आरोप केला होता.
त्यांनी खराब पंचगिरीवरुन आयसीसीचे अध्यक्षपद सोडण्याचीही धमकी दिली आहे. पंचांचे निर्णय आधीपासूनच फिक्स वाटत होते. आयसीसीचा अध्यक्ष म्हणून मला जे काही सांगायचे आहे ते मी पुढच्या बैठकीत बोलणारच आहे असे कमाल यांनी सांगितले.
रोहित शर्मा (९०) धावांवर असताना रुबेल हसनच्या कमरेच्या थोडयावर आलेल्या फुलटॉस चेंडूवर झेलबाद झाला. मात्र पंचांनी हा चेंडू नोबॉल ठरवला. रोहितने या जीवदानाचा फायदा उचलत आणखी ४७ धावांची भर घातली त्यामुळे भारताला तीनशेचा टप्पा ओलांडता आला. पंचांनी संशयाचा फायदा फलंदाजाला दिला तर, त्यासाठी पंचांना सर्वस्वी जबाबदार धरता येणार नाही तसेच भारतानेही सरस कामगिरी केली मात्र बांगलादेशला अजून हे सत्य पचवता आलेले नाही.









