पाकिस्तानच्या गोळीबारात पाच ठार, ३४ जखमी

Firing from Pakistan side

श्रीनगर – सीमावर्ती भागात पाकिस्तान भारतीय सुरक्षा चौक्यांबरोबर नागरी वस्त्यांनाही लक्ष्य करत आहे. सोमवारी पहाटे पाकिस्तानने जम्मूमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर केलेल्या गोळीबारात पाच गावक-यांचा मृत्यू झाला असून, ३४ जण जखमी झाले आहेत.जम्मूमधील अर्णिया सेक्टरमधील भारतीय चौक्या आणि नागरी वस्त्यांवर पाकिस्तानी रेंजर्सनी अंदाधुंद गोळीबार करताना उखळी तोफांचाही मारा केल्याची माहिती सीमा सुरक्षा दलाच्या प्रवक्त्याने दिली.

रविवारी रात्री दहा वाजल्यापासून पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार सुरु आहे. पाकिस्तानने छोटया, स्वयंचलित शस्त्रांसह उखळी तोफांचा वापर केला. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी या गोळीबाराल चोख प्रत्युत्तर दिले. अजूनही या भागात दोन्ही बाजूंकडून गोळीबार सुरु आहे.

पंचवीस जखमींना जम्मूच्या जीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या गोळीबारात अनेक घरांचे नुकसान झाले आहे असे पोलिस पथकाचे नेतृत्व करणा-या सिंह यांनी सांगितले. गोळीबार सुरु असताना, सिंह यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथक धोका पत्करुन घटनास्थळी पोहोचले व जखमींना रुग्णालयात हलवले.

सीमावर्ती भागातील नागरीकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. गोळीबारात भारताचा एकही जवान जखमी झाला नसल्याची माहिती बीएसएफच्या प्रवक्त्याने दिली. मागच्या चार दिवसात पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याची ही अकरावी वेळ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


5 − one =