
नवी दिल्ली- पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी या वर्षभरात सहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने लोकसभेत दिली. या सहा जणांमध्ये पाच भारतीय आणि एका श्रीलंकन नागरिकाचा समावेश आहे.
२०१४ या वर्षात १७ डिसेंबरपर्यंत पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी सहा जणांना अटक केल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हरिभाई चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तराद्वारे दिली. या सहा जणांनकडून भारतासंदर्भात पाकिस्तानला देण्यासाठीची काही कागदपत्रे सापडली आहेत.
देशात होणारी हेरगिरी रोखण्यासाठी केंद्र सरकारमधील विविध यंत्रणा आणि सर्व राज्य सरकारमधील यंत्रणा यांच्यात समन्वय ठेवला जात आहे. तसेच सीमाभागात होणा-या हलचालींवर देखील लक्ष ठेवले जात असल्याचे चौधरी यांनी म्हटले आहे. तसेच हेरगिरी रोखण्यासाठी राज्य पोलिस दलातील अधिका-यांची संख्या वाढवण्यात येणार आहे.









