
इस्लामाबाद – पाकिस्तानातील वायव्य भागातील आदिवासी प्रदेशावर लढाऊ विमानांनी केलेल्या हवाई हल्ल्यात ४८ अतिरेकी ठार झाले आहेत.
उत्तर वाझिरीस्तान आणि खैबर या आदिवासी प्रदेशात या अतिरेक्यांनी आश्रय घेतला होता. या भागात पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी केलेल्या हवाई हल्ल्यात ४८ अतिरेकी ठार झाल्याची माहिती लष्कर प्रवक्त्यांनी दिली. ‘तीस आणखी अतिरेकी ठार झाले. तसेच नऊ वाहने आणि काही मोटरसायकल या हल्ल्यात नष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले. याआधी मंगळवारी सकाळी उत्तर वाझिरीस्तान आणि खैबर येथे लपलेले १८ अतिरेकी पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात ठार झाले होते. कराची येथील विमानतळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने उत्तर वाझिरीस्तानमध्ये कारवाया करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत या कारवाईत ६५० अतिरेकी ठार झाले आहेत.









