
नवी दिल्ली- भारताच्या सागरी हद्दीत घुसखोरी करत असताना तटरक्षक दलाच्या जवानांनी अडवलेल्या पाकिस्तानी बोटीतील चार जणांनी गुजरातमधील पोरबंदरजवळ स्वतःला उडवून घेत स्फोट घडवून आणला. नौदलाच्या सतर्कतेमुळे दहशतवादी हल्ल्याचा कट उधळल्याचे धक्कादायक वृत्त आहे. विशेष म्हणजे मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याला सहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर महिन्याभरातच ही बातमी समोर आली आहे.
गुजरातच्या समुद्र हद्दीत एका संशयित पाकिस्तानी जहाजातून मोठ्या प्रमाणावर विस्फोटके वाहून नेत असल्याची माहिती नौदलाला मिळाली होती. ३१ डिसेंबरला याबाबतची माहिती गुप्तचर यंत्रणेने दिली होती. त्यानुसार एक जानेवारीला पहाटे या पाकिस्तानी मच्छिमारी बोटीच्या संशयित हालचाली लक्षात आल्यानंतर भारतीय नौदलाने चौकशीसाठी या बोटीला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र जहाजाने आपला वेग वाढवत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र नौदलाने पोरबंदरपासून ३६५ किलोमीटर अंतरावर असताना या बोटीला चारही बाजूंनी घेरले. आपण घेरलो गेल्याचे निदर्शनास येताच बोटीवर असलेल्यांनी स्वतःला उडवून घेत स्फोट घडवून आणला. त्यात चार जण मृत्यूमुखी पडल्याचे वृत्त आहे.
Fishing boat intercepted by coast guardडोर्नियर एयरक्राफ्टच्या मदतीने हे ऑपरेशन करण्यात आले. डोर्निअर विमानाने शोध घेत दिवे न लावता लपत लपत जाणारी ती संशयित बोट शोधून काढली. त्यानंतर तटरक्षक दलाच्या गस्त घालणा-या नौकेला वर्दी देण्यात आली. कराची येथील केती बंदरातील ही मच्छिमार बोट होती. संशयित हालचाली लक्षात येताच त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता ते पळू लागल्याने संशय आणखी बळावला, असे नौदल्या अधिका-यांनी शुक्रवारी बोलताना सांगितले.









