पाटणाः चेंगराचेंगरीत ३३ ठार

patanaवृत्तसंस्था, पाटणा
पाटणा शहरातील गांधी मैदानात काल (शुक्रवारी) दसऱ्यानिमित्त रावणदहनाच्या कार्यक्रमावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ३३ जण ठार झाले, तर अनेक जण जखमी झाले. मृतांमध्ये वीस महिला, अकरा मुले आणि दोन पुरुष यांचा समावेश आहे.
पाटण्यातील दसरा कार्यक्रमाला बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर विजेची तार पडली अशी अफवा पसरली आणि घाबरलेल्या लोकांनी पळापळ सुरू केली. या प्रकारामुळे गोंधळ वाढला आणि चेंगराचेंगरीस सुरुवात झाली.
दुर्घटनेची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा करुन घटनेची माहिती घेतली तसेच मृतांच्या नातलगांना दोन लाख रुपयांची तर प्रत्येक जखमीसाठी ५० हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली. बिहारचे मुख्यमंत्री मांझी यांनी मृतांच्या नातलगांना तीन लाख रुपयांची तर प्रत्येक गंभीर जखमीसाठी ५० हजार रुपयांच्या आणि अन्य जखमींसाठी प्रत्येकी २० हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली.
जखमींना पाटण्यातील पीएमसीएच आणि आयजीआयएमएसमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनेची तसेच पीडितांबाबतची माहिती देण्यासाठी प्रशासनाने ०६१२-२२१९८१० ही हेल्पलाइन सुरू केली आहे. बिहार सरकारने चेंगराचेंगरीची चौकशी करणार असल्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्रालयाने पाटणातील चेंगराचेंगरीची चौकशी करुन अहवाल सादर करा, असा आदेश बिहार सरकारला दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


nine × 1 =