जिल्हा माहिती कार्यालयात राष्ट्रीय पत्रकार दिन

यवतमाळ – अलीकडे शासनाच्यावतीने पारदर्शक प्रशासनाला फार महत्व दिले जात आहे. शासनाच्या पारदर्शक कारभारासाठी माध्यमांची भूमिका अतिशय मोलाची आणि त्यासाठी हातभार लावणारी आहे, असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार दिनेश गंधे यांनी केले.
जिल्हा माहिती कार्यालयात पत्रकारी संघटनांच्या सहकायार्ने राष्ट्रीय पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्रमिक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष नितीन पखाले, जेष्ठ पत्रकार अनिरुध्द पांडे, माहिती खात्याचे सेवानिवृत्त अधिकारी तथा पत्रकार रणजीत चंदेल आदी उपस्थित होते.
प्रेस कॉन्सील आॅफ इंडियाची स्थापना १९६६ साली झाली असून याचवर्षी १६ नोव्हेंबर रोजी या संस्थेने आपल्या कामकाजास प्रारंभ केला होता. त्यामुळे हा दिवस संपुर्ण भारतभर राष्ट्रीय पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने जिल्हा माहिती कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रणजीतसिंह चंदेल यांनी अध्यक्षीय भाषणात माध्यमे व प्रशासन यांच्यातील संबंधांवर प्रकाश टाकला. पारदर्शक प्रशासनात माध्यमांची भूमिका या विषयावर गंधे यांच्यासोबतच अनीरुध्द पांडे, नितीन पखाले यांनी आपले विचार व्यक्त केले. सुरुवातीस मराठी पत्रकारीतेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमा मागची भूमिका प्र. जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड यांनी मांडली. कार्यक्रमाचे संचलन श्रीकांत राऊत यांनी केले तर आभार नागेश गोरख यांनी मानले. कार्यक्रमास पत्रकार मेहमुद नाथानी, गणेश राऊत, विरेंद्र चौबे, प्रविण देशमुख, संदिप खडेकर, दिपक शास्त्री, कैलाश भगत, किरण कोरडे आदींसह अनेक पत्रकार उपस्थित होते.









