
यवतमाळ, दि. २१ – मांगल्याचं प्रतीक असलेला गुढीपाडवा जनतेच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आनंदासह आरोग्य घेऊन येवो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करीत महसूल राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आज शनिवारी चैत्र प्रतिप्रदेनिमित्त कुटुंबासमवेत येथील टिळकवाडीस्थित आपल्या घरी गुढी उभारली. हे नवीन वर्ष तमाम जनतेला अधिक सुखकारक ठरून, सध्या निसर्गाच्या लहरीपणाने संकटात असलेल्या शेतकरी बांधवांच्या आयुष्यातही सुखाची पेरणी करेल, असा आशावाद यावेळी ना. संजय राठोड यांनी व्यक्त केला.चैत्र महिना हा मराठी महिन्यातला पहिला दिवस असून अनेक चांगल्या कामांची सुरूवात, नवीन संकल्प हे आजच्या दिवसापासून केले जातात. या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आणि येथील शेतकरी, कष्टकरी, सामान्य जनतेच्या कल्याणाची कामे आपल्या हातून सदैव घडावी यासाठी ईश्वराने आपल्याला काम करण्याची अधिक ऊर्जा द्यावी आणि जनतेचे प्रेम व सहकार्य असेच मिळत राहावे, अशी प्रार्थना याप्रसंगी ना. संजय राठोड यांनी केली. यावेळी ना. संजय राठोड यांच्या सहचारिणी सौ. शीतल, मुलगी दामिनी, मुलगा सोहम यांच्यासह कुटुंबातील सर्व सदस्य, शिवसेनेनचे पदाधिकारी, शिवसैनिक प्रामुख्याने उपस्थित होते.









