मुंबई- वर्षभरात पेपरलेस कारभाराची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचा संकल्प राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) घेतला असून, एसटीच्या विविध पासधारकांना स्मार्ट कार्ड देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. महामंडळातर्फे देण्यात येणारे विद्यार्थी पास, आहिल्याबाई होळकर पास, आवडेल तेथे प्रवास योजनेचा पास, ४ व ७ दिवसांचे पास तसेच मासिक, त्रमासिक पास आता स्मार्ट कार्ड स्वरूपात देण्यात येणार आहेत.
राज्यात एसटीचे सुमारे ३० हजारांहून अधिक पासधारक प्रवासी असून, त्यांना या स्मार्ट कार्डचा लाभ होणार आहे. सध्या सर्व विभागीय मुख्यालयातील आगारांत स्मार्ट कार्डचा वापर सुरू झाला असून, या महिन्याच्या अखेरीस राज्यातील सर्व आगारांत स्मार्ट कार्ड उपलब्ध होणार आहेत. पासची रक्कम स्वीकारल्यावर आवश्यक माहिती नोंदवून स्मार्ट कार्ड व ओळखपत्र देण्यात येईल. प्रवास करताना वाहकाजवळील ईटीआयएम मशिनद्वारे स्मार्ट कार्डची माहिती नोंदवली जाईल. रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन प्रणालीवर हे स्मार्ट कार्ड काम करेल.
त्यामध्ये ‘सिक्युरिटी की’ असल्याने या कार्डाचा गैरवापर करता येणार नाही. मुदत संपल्यानंतर सहा महिन्यांच्या आत या स्मार्ट कार्डचे नूतनीकरण करणे आवश्यक असेल. स्मार्ट कार्डचा वापर ५ वर्षापर्यंत करता येणार आहे. त्यासाठी पासधारकांना स्मार्ट कार्डचे ३० तर ओळखपत्रासाठी ५ रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. या स्मार्ट कार्डमुळे वेळेची बचत होईल आणि वाहकांच्या कामात सुलभता येईल, असा विश्वास एसटी प्रशासनाने व्यक्त केला आहे.









